

Congress President Vishwajit Kovase Rally
गडचिरोली: काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजित कोवासे यांनी पदग्रहण सोहळ्यानिमित्त रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव असलेले अॅड.विश्वजित कोवासे यांची मागील आठवड्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
त्यानंतर तत्कालिन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या समर्थकांनी नियुक्ती रद्द करण्याची मागणी केल्याने पक्षांतर्गत दुफळी दिसून आली. यामुळे विश्वजित कोवासे यांच्या समर्थकांनी तत्काळ नियोजन करुन मंगळवारी (दि.२६) पदग्रहण सोहळा आयोजित केला.
मंगळवारी सायंकाळी उशिरा झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आ.विजय वडेट्टीवार, माजी मंत्री वसंत पुरके, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अजय चिकारा, महाराष्ट्र प्रभारी कुणाल चौधरी, प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे,आ.अभिजित वंजारी, आ.रामदास मसराम, माजी खासदार मारोतराव कोवासे,माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम, पंकज गुड्डेवार, विनोद शनिवारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
देशाला काँग्रेसमुक्त करण्याच्या भाजप नेत्यांच्या घोषणेचा संदर्भ देत वडेट्टीवार म्हणाले की, पृथ्वीवरील कोणतीही शक्ती या जुन्या पक्षाला संपवू शकत नाही, कारण तो जनतेमध्ये रुजलेला पक्ष आहे. काँग्रेसला मुळापासून उखडून टाकण्याची भाषा करणाऱ्यांना एक दिवस जनताच संपवून टाकेल, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेस मध्ये निष्ठावान आणि संयमी कार्यकर्त्यांला योग्य वेळी संधी दिली जाते, असे सांगून वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
सरकारच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवू: कोवासे
सत्काराला उत्तर देताना, विश्वजित कोवासे यांनी आपल्यावर एक मोठी जबाबदारी सोपवल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानले. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त केला जात असताना शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्यांना मजूर म्हणून काम करण्यास भाग पाडले जात आहे, असा आरोप विश्वजित कोवासे यांनी केला. सरकारच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी इतर नेत्यांनीही आपली मते व्यक्त करून श्री. कोवासे यांना शुभेच्छा दिल्या. विश्वजित कोवासे यांच्या रूपाने जिल्ह्याला एक तरुण आणि डॅशिंग काँग्रेस अध्यक्ष मिळाला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, रजनीकांत मोटघरे, रमेश चौधरी, रुपेश टिकले, हरबाजी मोरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.