गडचिरोली : लग्न लावून गावी परत जाणाऱ्या बोलेरो गाडीने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वारासह बोलेरो गाडीतील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२५) सायंकाळी साडेचारच्या सुमारास मालेवाडा-येरकड मार्गावरील सुरसुंडी गावाजवळच्या एका वळणावर घडली.
बबिता गावतुरे (वय ५६, रा. चिंचोली) असे मृत महिलेचे नाव आहे. तळेगाव येथील नवरदेवाचे मालेवाडा येथे वधूमंडपी लग्न होते. लग्न आटोपल्यानंतर काही व-हाडी बोलेरो गाडीने आपल्या गावाकडे परत जात असताना सुरसुंडी गावाजवळच्या वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत बोलेरो गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. यातील बबिता गावतुरे या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर बोलेरोमधील गरोदर मातेसह १७ जण जखमी झाले. गंभीर जखमी असलेल्या १० जणांना गडचिरोली येथे हलविण्यात आले, तर उर्वरित जखमीवर धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रोशन रामचंद्र ठलाल, गौतम मडावी,जयश्री शेंडे,,देवांगना गावतुरे, अशोक मोहुर्ले,मीराबाई गुरनुले,शालू मोहुर्ले,पी.एल.गावतुरे, वंशिका गावतुरे, सुखदेव गावतुरे, शिवम गावतुरे, सोनू मोहुर्ले,, राकेश गावतुरे, कमल ठलाल , अद्विका शेंडे अशी जखमींची नावे असून, बहुतेक जण धानोरा तालुक्यातील रहिवासी आहेत.