गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाने गोळी झाडून जीवन सपंवले
गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा – ‘आदमी मरता है, आत्मा नहीं..’, असा व्हॉटसअॅपवर स्टेटस ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी तैनात राज्य राखीव दलाच्या सुरक्षा रक्षकाने कानशिलात गोळी झाडून जीवन संपवले. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
संबंधित बातम्या –
- Jalgaon Crime : म्हैस चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल, जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ
- राष्ट्रवादीच्या जन्मापासून सोबत : मंत्री छगन भुजबळ
- Ashok Chavan Resign | अशोक चव्हाणांना राज्यसभेची आस : उद्धव ठाकरे
उत्तम किसनराव श्रीरामे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी होते. ते विवाहित होते. राज्य राखीव दलाच्या पुणे येथील गट क्रमांक १ मध्ये कार्यरत असलेले उत्तम श्रीरामे हे जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या ‘शिखरदीप’ या शासकीय निवासस्थानी सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते.
आज सकाळी ८ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत कर्तव्य बजावल्यानंतर ते जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या आवारातच असलेल्या विश्रामगृहात गेले. तेथे खाटेवर झोपून त्यांनी आपल्या डाव्या कानशिलात गोळी झाडून घेतली. ती गोळी उजव्या कानशिलातून बाहेर निघाली. गोळीबाराचा आवाज येताच बंगल्यावर तैनात इतर सुरक्षा रक्षक धावत गेले. तेव्हा उत्तम श्रीरामे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
घटनेच्या काही वेळापूर्वीच जिल्हाधिकारी संजय मीणा हे बाहेर गावाहून येऊन आपल्या निवासस्थानी पोहोचले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. आत्महत्या करण्यापूर्वी श्रीरामे यांनी ‘आदमी मरता है, आत्मा नहीं..’, असा स्टेटस व्हॉटस अॅपवर ठेवला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
तणावामुळे जीवन संपवले?
सीआरपीएफ आणि एसआरपी जवान अनेक महिने आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहतात. बरेचदा सुट्ट्या मिळत नसल्याने ते तणावात राहतात. त्यामुळे तणाव हे श्रीरामे यांच्या जीवन संपवण्यामागील कारण होते की आणखी काही, हे पोलिस तपासात स्पष्ट होणार आहे. मात्र, सुट्ट्या मिळत नसल्याने तणावातून जवानांनी आत्महत्या केल्याच्या घटना यापूर्वीही जिल्ह्यात घडल्या आहेत, हे येथे उल्लेखनीय आहे.