चंद्रपूर : शेतावर जात असताना तोल जावून बंधाऱ्यातील पाण्यात पडून एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली. यादव महादेव मेश्राम असे मृत्त व्यक्तीचे नाव असून तो खांबाडा येथील रहिवासी होता.
शनिवारी शेतकरी यादव मेश्राम हे दुपारी चार वाजता सुमारास गोंदेडा मार्गावरील शेत बघण्यासाठी गेले होते. नाला ओलांडून जाताना फुटलेल्या बंधाऱ्यावरुन तोल जाऊन ते पाण्यात पडले. व पाण्यात बुडुन त्यांचा दुर्दैवी मृत्यू आला. या घटनेने खांबाडा गावात शोककळा पसरली आहे.
यादव मेश्राम हे खांबाडा येथे एकटेच राहत होते. त्यांना दोन मुले व पत्नी असा परिवार आहे. कुटुंबिय रोजगाराच्या निमित्ताने चंद्रपूर येथे राहत आहेत. घटनेच्या दिवशी सायंकाळ होऊनही घरी परत आले नाही. त्यामूळे शेजाऱ्यांनी काही नागरीकांच्या मदतीने त्यांच्याच शेतशिवरात शोध घेतला. परंतु ते सापडले नाहीत. रात्र झाल्यामुळे शोधमोहिम थांबवली. रविवारी पहाटेपासून पुन्हा शोध सुरू केला असता यादव मेश्राम यांचा मृतदेह बंधाऱ्यात तरंगताना आढळला. सदर घटनेची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. नेरी पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक चौधरी यांनी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृत्तदेह बाहेर काढून पंचनामा केला. व तो मृत्तदेह उत्तरणीय तपासणीसाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.