

चंद्रपूर : "शेतकरी, आदिवासी, महिला आणि समाजातील प्रत्येक दुर्बळ घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करत आहे. याच धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत," अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री डॉ. उईके यांनी शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके आणि १९४२ च्या चिमूर क्रांतीतील हुतात्म्यांचे स्मरण केले. त्यांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी शासन-प्रशासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा सविस्तर आढावा सादर केला.
पालकमंत्री डॉ. उईके यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली, ज्यात आदिवासी आणि शेतकरी कल्याणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियाना’अंतर्गत आदिम जमातींसाठी ४८२ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. तसेच, ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजने’सारखा धोरणात्मक निर्णय आदिवासी भगिनींच्या सक्षमीकरणासाठी घेण्यात आला आहे. असे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा ४९ कोटी ७० लाखांचा हप्ता जिल्ह्यातील २ लाख ४८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यासोबतच ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी’ योजनेतून अनुक्रमे २३२ आणि ५६१ गावांची निवड करण्यात आली आहे. रमाई आवास योजनेचे ८४७ प्रस्ताव मंजूर झाले असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा १,३७२ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. अशी माहिती पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिली.
यावेळी पालकमंत्री डॉ. उईके यांनी ‘मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायतराज अभियानात’ सहभागी होण्याचे आणि अवयवदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात वीरपत्नी, वीरनारी, आदर्श ग्रामपंचायती आणि अवयवदान करणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबीयांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.