

चंद्रपूर : घराच्या उंबरठ्यावरून उचलून नेत सात वर्षीय चिमुकल्याचा जीव घेणाऱ्या बिबट्याला पंधरवड्यानंतर जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले आहे. दि. 18 सप्टेंबर रोजी सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना समोर आली होती. तब्बल पंधरवड्यापासून गडबोरी गावाच्या अवतीभवती ट्रॅप कॅमेरे लाईव्ह ट्रॅक व लाईव्ह कॅमेरे आणि पिंजरे लावून बिबट्याला जेरबद करण्याचीतl योजना आखण्यात आली होती. प्रशिल बबन मानकर असे मृत्तक मुलाचे नाव आहे.
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव लगतच्या गडबोरी गावातील सात वर्षीय प्रशिल मानकर हा 18 सप्टेंबर रोजी रात्री साडेसात सुमारास सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपातून महाप्रसाद घेऊन काकांसोबत घरी परत आला होता. घरात प्रवेश करीत असतानाच घराच्या उंबरठ्यावरून बिबट्याने त्याला उचलून नेले. आणि गावालगतच्या पहाडी भागात घेऊन गेला. या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला. दुसऱ्या सकाळी सहाच्या सुमारा त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती व संतापाची लाट उसळली होती. वन विभागाला नागरिकांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
घटनेनंतर त्वरित वनविभागाने घटनास्थळी ट्रॅप व लाईव्ह कॅमेरे बसवून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. सततच्या निरीक्षणानंतर घटनेस जबाबदार असलेला बिबट निश्चित करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम राबविण्यात आली.
आज गुरुवारी (दि. 02 ऑक्टोबर) रोजी सकाळी बिबट नैसर्गिक गोठ्यात अडकल्याचे लक्षात येताच, डॉ. रविकांत खोब्रागडे (पशुवैद्यकीय अधिकारी, TATR चंद्रपूर) व श्री. ए. सि. मराठे (पोलीस नायक व शुटर, TATR चंद्रपूर) यांच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांच्या सहकार्याने 4 वर्षांची मादी बिबट रायफलच्या सहाय्याने बेशुद्ध करून सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आली.
ही संपूर्ण मोहीम मा. डॉ. कुमारस्वामी (भा.व.से., ब्रम्हपुरी वनविभाग) व मा. डॉ. एम. बी. गायकवाड (सहायक वनसंरक्षक, प्रादेशिक व वन्यजीव, ब्रम्हपुरी) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार यांनी नेतृत्व केले.
सहाय्यक अधिकारी व कर्मचारी यामध्ये एन. टी. गडपायले, एस. बि. उसेंडी, पी. एस. मानकर, आर. जी. कोडापे, बी. डी. चिकाटे, कु. आर. के. उईके, वाय. एम. चौके, आर. एम. सुर्यवंशी तसेच सिंदेवाही परिक्षेत्रातील वनरक्षक, STPF सदस्य, RRU टीम, गस्तीपथक टीम, PRT टीम, सॉब नेचर फाऊंडेशन (सावरगाव टीम) व वनमजूर यांनी विशेष परिश्रम घेतले.
बिबट्याच्या जेरबंदीनंतर गावकरी व परिसरातील नागरिकांत भीतीचे सावट काही प्रमाणात दूर झाले असून पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अतिरिक्त काळजी घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.