

Buldhana Janefal Murder Case
बुलढाणा : जानेफळ (जि.बुलढाणा) येथील एका व्यक्तीचे अपहरण करून त्याचा खून करणा-या टोळीतील दीड वर्षापासून फरार असलेला व पोलिसांना चकमा देत विविध राज्यातून वेषांतर करून फिरणारा मुख्य सुत्रधार आरोपी अमोल राजपूत याला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.६) छत्रपती संभाजीनगर येथून शिताफीने जेरबंद केले आहे.
या अपहरण व खुन प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ६ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जानेफळ (ता.मेहकर) येथील इंदिरा नगरातील रहिवासी दिलीप इंगळे (वय ४५) यांना २२ जून २०२४ च्या रात्री गावातील अमोल राजपूत व त्याच्या साथीदारांनी फूस लावून पळवून नेले होते. व अहिल्यानगर येथे नेऊन इंगळे यांचा खुन केला होता.
मृत दिलीप इंगळे यांची पत्नी ज्योती इंगळे यांच्या तक्रारीवरून अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करुन जानेफळ पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. मात्र या टोळीचा मुख्य सुत्रधार आरोपी अमोल जयसिंग राजपूत हा फरार झाला होता. व सतत वेषांतर करून स्वत:ची ओळख लपवत दीड वर्षापासून चंदीगढ, छत्तीसगढ, दिल्ली, कर्नाटक अशा विविध राज्यांत वास्तव्य करत होता.
याप्रकरणात फरार आरोपी अमोल राजपूत याला शोधण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व विशेष तपास पथके कार्यान्वित होती. दरम्यान, मुख्य आरोपी अमोल राजपूत हा २७ डिसेंबर रोजी चंदीगढ येथून छत्रपती संभाजीनगर येथे आल्याची माहिती तांत्रिक पद्धतीने मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचे मागावर राहून शिताफीने आज 'हाटेल राधिका इन' पैराडाईज चौक छत्रपती संभाजीनगर येथून शिताफीने त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोहेका दिपक लेकुरवाळे, तांत्रिक शाखेचे राजू आडवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.