

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : अनेक दिवसांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले (Shishupal Patle) यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे. राज्य सरकार शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते. आपण अनेकदा या समस्यांबाबत संबंधित मंत्र्यांना भेटूनही कामे होत नसल्याने त्यांनी भाजपचा राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला होता.
शिशुपाल पटले (Shishupal Patle) यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच त्यांनी २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांनी दिलेला राजीनामा भंडारा जिल्ह्यातील भाजपसाठी धक्का मानला जात आहे.
शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडे पाठपुरावा करीत होतो, मात्र राज्यातील सरकारने व सत्तेत सहभागी असलेल्या पक्ष नेतृत्वाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी स्पष्ट केले आहे. जनसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागले. ही बाब पक्षनेत्यांच्या ध्यानात आणून दिली. (Shishupal Patle)
पक्षामध्ये जुन्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे. भाजपमध्ये लोकशाहीचा अस्त झाला. ज्यांनी भाजपची स्थापना केली त्यांच्या विचारांना आताच्या नेत्यांनी तिलांजली दिली. अटलबिहारी वाजपेयींच्या काळातील भाजपा आता राहिली नाही. खºया कार्यकर्त्यांचा विसर भाजपला पडू लागला आहे. कर्मठ सामान्य कार्यकर्त्याची किंमत पक्षाला राहिली नाही. सामान्य कार्यकर्त्यांना पक्षात राहून न्याय देता येत नसेल. तर पक्षात राहून काय उपयोग? अशी खंत शिशुपाल पटले यांनी व्यक्त केली. (Shishupal Patle)