भंडारा, पुढारी वृत्तसेवा : संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणींचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त आहे. वाघिणींच्या आगमनामुळे नवेगाव-नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प नैसर्गिक अधिवासासाठी उत्तम ठिकाण असून आज सोडण्यात आलेल्या वाघिणींच्या प्रजननातून वाघांची पुढील पिढी दर्जेदार निर्माण होण्यास सहाय्यभूत ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रम्हपुरी भूभागातून आणण्यात आलेल्या वाघीण नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आज शनिवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात आल्या. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार सुनील मेंढे, अशोक नेते, आमदार विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक रंगनाथ नाईकडे, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी प्रकल्प डॉ. जितेंद्र रामगावकर, विशेष पोलिस महासंचालक (नक्षल सेल) संदीप पाटील, उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव-नागझिरा जयरामेगौडा आर., गोंदिया उपवनसंरक्षक कुलराज सिंह, भंडारा उपवनसंरक्षक राहूल गवई, गोंदिया निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपसंचालक नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र साकोली पवन जेफ, विभागीय वन अधिकारी प्रदीप पाटील व सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र सदगीर यावेळी उपस्थित होते.