

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : भंडारा शहरातील शीतला माता मंदिर ते खातरोडवरील रेल्वे क्राॅसिंगदरम्यान रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या ४३ दिवसांपासून खांबतलाव चौकात साखळी आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका माथेफिरुने त्यांच्या मंडपात जाऊन आंदोलनात सहभागी झालेल्या माजी सैनिकावर हल्ला केला. या हल्ल्यात माजी सैनिक जखमी झाले आहेत.
शहरातील शीतला माता मंदिर ते रेल्वे क्राॅसिंगदरम्यान रस्ता खराब झाला असून आतापर्यंत या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा नाहक जीव गेला आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्तीच्या मागणीसाठी जय जवान जय किसान संघटनेच्या पदाधिका-यांनी मागील ४३ दिवसांपासून खांबतलाव चौकात मंडप उभारुन साखळी आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात गणेशपूर येथील रहिवासी लक्ष्मण कनोजिया हेही सहभागी आहेत. ते माजी सैनिक आहेत. आज दुपारच्या सुमारास एक माथेफिरु त्यांच्या मंडपात आला. 'इथे तुम्ही कशाला बसला आहात' असा प्रश्न करीत लक्ष्मण कनोजिया यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात लक्ष्मण कनोजिया यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.
घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले. अधिक तपास सुरू आहे. प्रशासनाकडून सदर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे.