बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : कत्तलखान्याकडे चाललेला ट्रक नांदूरा शहरात बंद पडला. ट्रकमध्ये २५ गायींना कोंबून भरल्याचे व त्यापैकी ८ गायींचा गुदमरून मृत्यू झाल्याचे दिसून आल्याने संतप्त नागरिकांनी सर्व गायींना बाहेर काढून घोषणा देत ट्रक पेटवून दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदूरा शहरात राष्ट्रीय महामार्गावर दिवाणी न्यायालयाच्या समोर मंगळवारी मध्यरात्री (एम.एच. ०४-एचई १८८९) या क्रमांकाचा ट्रक बिघाड झाल्याने बंद पडला. त्यावेळी दुर्गंधी आल्याने काही नागरिकांनी संशयावरून या ट्रकमध्ये बघितले असता त्यात २५ गायींना खचाखच कोंबून भरलेले असल्याचे व त्यातील ८ गायींचा गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले. याबाबत माहिती पसरल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. यावेळी ट्रकचा चालक व वाहक तेथून पसार झाले. ट्रकमधील सर्व गोवंशाला बाहेर काढून संतप्त नागरिकांनी ट्रकला आग लावली.
या प्रकाराची माहिती मिळताच नांदूरा पोलीस घटनास्थळी पोहोचले व अग्नीशमन दलाद्वारे ट्रकची आग विझवण्यात आली. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. पोलिसांनी प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार ट्रकच्या चालक वाहकावर गुन्हा नोंदवला आहे. ट्रक जाळल्यानंतर नांदूरा शहरात तणावाचे वातावरण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.