अमरावती; पुढारी वृत्तसेवा : बहिरम येथील पंचशील आश्रमशाळेतील ३३ मुलींना शुक्रवारी रात्री उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकारमुळे एकच खळबळ उडाली. एका मुलीला अमरावती येथे पुढील उपचारासाठी हलविले. तर ८ मुलींना घरी सोडण्यात आले आहे. इतर सर्व मुलींची प्रकृती स्थिर असून डॉक्टर मुलींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
आश्रम शाळेतील ३ ते ४ मुलींना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर आणखी काही मुलींना याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी जवळपास ३३ मुलींनी आपल्याही पोटदुखीचा त्रास होत असल्याचे सांगितले. त्यामुळे शाळा प्रशासनाने सर्वांना तपासणीसाठी अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. यापैकी केवळ तीन चार मुलींना पोटदुखी, उलटीचा त्रास जाणवत होता. तर काहींना सर्दी खोकल्याचा त्रास होता. सध्या या सर्व मुलींची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांची टीम लक्ष ठेऊन आहे.
सदर घटनेची माहिती मिळाली आहे. चौकशीसाठी सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असे धारणीचे प्रकल्प अधिकारी सावनकुमार यांनी सांगितले.
रुग्णालयात ३३ मुलींना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एक मुलींला अमरावती येथे रेफर केले. इतर मुलींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
– डॉ. सुरेंद्र ढोले, वैद्यकीय अधीक्षक
तीन चार मुलींची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे इतर मुलींना आजाराबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी सर्वांनी हात वर केले. ज्यांनी हात वर केले. त्या सर्व मुलींना तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, दोन, तीन मुलींना पोटदुखीचा त्रास असल्याने इतर मुलींचा पुढील धोका टाळण्यासाठी रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले. सध्या सर्व मुलींची प्रकृती स्थिर आहे.
– राजश्री अटाळकर, अधीक्षक, पंचशील आश्रमशाळा बहिरम
हेही वाचलंत का ?