Amravati | स्वागत कमानीवरुन वाद! पांढरी खानमपूरमध्ये संचारबदी, २०० कुटुंबांनी गाव सोडले | पुढारी

Amravati | स्वागत कमानीवरुन वाद! पांढरी खानमपूरमध्ये संचारबदी, २०० कुटुंबांनी गाव सोडले

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पांढरी खानमपूर गावातील प्रवेशद्वारावरील स्वागत कमानीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यावरून वाद चिघळला आहे. गावकऱ्यांनी आंबेडकरी समाजावर बहिष्कार टाकल्याचा आरोप करत २०० कुटुंबांनी बुधवारी (दि.६) सकाळी गाव सोडले. हजारो समाज बांधव अंजनगाव सूर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघाले आहेत.

ग्रामपंचायतच्या ठरावासह शासनाच्या सर्व परवानग्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेल्या प्रवेशद्वारावरील स्वागत कमानीला आहेत. मात्र असे असतानाही गावातीलच काही लोकांनी विरोध करत आमच्यावर बहिष्कार टाकला आहे, असा आरोप आंबेडकरी समाज बांधवांचा आहे.

दरम्यान, बुधवारी (दि. ६ मार्च) रोजी गावात पोलीस प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता ही संचारबंदी लागू केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावरुन पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये झटापटदेखील झाली.

आंबेडकरी समाज बांधव बुधवारी सकाळी १० वाजता पांढरी खानमपूर सोडून निघाले आहेत. अंजनगावसुर्जी, दर्यापूर, भातकुली मार्गे ते अमरावती येथे पोहोचतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पुतळ्याला अभिवादन करून विभागीय आयुक्तांना ते निवेदन देतील. न्याय न मिळाल्यास तेथून परत पायी चालत मुंबईत थेट मंत्रालय येथे पोहोचून ठिय्या आंदोलन करण्याचे त्यांनी ठरविले आहे.

 हे ही वाचा :

Back to top button