नागपूर : पुढारी वृत्तसेवा – आमच्या २७ टक्के आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही, अशी प्रतिक्रिया ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली आहे. ५ फेब्रुवारी रोजी सरकारच्या निर्णयामुळे संतप्त ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी थेट मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना आवाहन देत बुधवारी महाप्रबोधन यात्रेची तर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजीनगर येथे २० रोजी ओबीसी समाजाचे शक्ती प्रदर्शन करण्याचे काल ठरविले.
संबंधित बातम्या –
विशेष म्हणजे विदर्भातील दोघेही नेते असताना वडेट्टीवार यांच्या बैठकीत तायवाडे यांना निमंत्रण नव्हते. आम्ही एक आहोत, संपर्क झाला नाही असे म्हणत वडेट्टीवार यांनी वेळ मारून नेली. आता वडेट्टीवार आणि भुजबळ ओबीसी समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप तायवाडे यांनी केला आहे. यापूर्वी अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे यांच्या कुणबी महासंघाने ओबीसी महासंघाच्या संविधान चौकातील आंदोलन, उपोषणातून माघार घेतली होती हे विशेष.
एकंदरीत गेल्या काही दिवसात मराठा समाजसंदर्भात सरकारच्या निर्णयानंतर ओबीसी समाजातही लढ्याची तयारी सुरू असली तरी यात नेत्यांमध्येच मतभिन्नता असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नागपूरच्या दीक्षाभूमी येथून आज ओबीसी जनजागर रथयात्रेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय ओबीसी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान ही यात्रा जिल्ह्यातील विविध भागात जनसंवाद, जनजागृती करणार आहे. ओबीसींच्या विविध मागण्यांसह जातनिहाय जनगणना करून त्याआधारे ओबीसींना आरक्षण देण्यात यावे, ही प्रमुख मागणी या यात्रेच्या माध्यमातून असणार आहे. देशभरात ६० टक्के असलेल्या ओबीसी समाजाला तुटपुंजे आरक्षण असल्याने जातनिहाय जनगणना करून जनगणनेच्या आधारे आम्हाला आरक्षण देण्यात यावं, यासह विविध मागण्या घेऊन आजपासून या रथयात्रेला सुरुवात झाली आहे. जिल्हाभर ही यात्रा लोकांना जागृत करेल आणि ५ फेब्रुवारीला कामठी येथे महासभा पार पडून यात्रेचा समारोप होणार आहे.