नागपूर : विरोधकांना अशा धमक्या लाजीरवाणी बाब : नाना पटोले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी झालेले भाजप सरकार महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचे काम करत आहे. सत्तेविरुद्ध बोलाल तर जीवे मारण्याची धमकी येईल, या पद्धतीने धमक्या येत आहेत. सगळ्या यंत्रणा सज्ज असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विरोधकांना अशा धमक्या येणे ही लाजिरवाणी बाब असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांना धमकी संदर्भात पटोले माध्यमांशी बोलत होते. मुळात ही पिलावळ कोणाची हे तपासुन ठोस कारवाई झाली पाहिजे. आम्हाला प्रतिक्रिया देण्याचे काही कारण नाही. मात्र, भाजप सत्तापिपासू पक्ष झाला आहे. मणिपूरची आग ते थांबवू शकले नाहीत. भाजप जाणीवपूर्वक असे राजकारण करीत आहे. महाराष्ट्र भाजपच्या हातातून जात असल्यानेच अश्या घटना घडत आहेत.
महागाई कमी करू, हाताला काम देऊ यात सरकार अपयशी झाले आहे. या सगळ्या विषयाला बगल देण्याचे काम सुरू आहे. याविषयीची महाराष्ट्र सरकारला लाज नाही. नापास झालेले भाजप सरकार पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, याचे परिणाम भाजपला भोगावेच लागतील असा इशारा पटोले यांनी दिला.
हेही वाचा;