नागपूर : ‘अवकाळी’ पावसाचा नागपूर जिल्ह्यात जोरदार तडाखा, पिकांचे नुकसान | पुढारी

नागपूर : ‘अवकाळी’ पावसाचा नागपूर जिल्ह्यात जोरदार तडाखा, पिकांचे नुकसान

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात अनेक भागात थैमान घातल्यानंतर रविवारी दुपारी अवकाळी पावसाने नागपूर जिल्ह्यालाही जोरदार तडाखा दिला. कळमेश्वर, काटोल, नरखेड, मौदा तालुक्यांसह लगतच्या भागांतही मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. हिंगणा, वाडी परिसरालाही वादळी पावसाने झोडपून काढले. अनेक भागात गारांचा सडा पडल्याने हिमवृष्टी होणाऱ्या भागांसारखे चित्र जिल्ह्यातही दिसले. या अस्मानी अवकृपेमुळे शेतातील उभे पीक आडवे झाले. संत्रा, मोसंबीसोबतच गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक हातचे गेल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. तातडीने पंचनामे करून ठोस आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हवामान विभागाने पुन्हा अवकाळी फटका बसण्याची शक्यता व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

रविवारी काटोल व नरखेड तालुक्यात मोठया प्रमाणात आलेल्या गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन तो अहवाल शासनाकडे सादर करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी केली आहे. त्यांनी काटोल व नरखेड तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिपचे कृषी सभापती प्रविण ऊर्फ बालु जोध, पंस सभापती संजय डांगोरे, माजी उपसभापती अनुप खराडे यांच्यासह सरंपच, ग्रामपंचायत सदस्य, नायब तहसीलदार, खंडविकास अधिकारी पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button