चंद्रपूरात ७ इमारतींवर चालला बुलडोजर; १५ अतिधोकादायक इमारतींना नोटीस | पुढारी

चंद्रपूरात ७ इमारतींवर चालला बुलडोजर; १५ अतिधोकादायक इमारतींना नोटीस

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा चंद्रपूर शहरातील महानगरपालिका हद्दीतील १५ इमारती या अतिधोकादायक वर्गातील आहेत. त्यापैकी काल (शुक्रवार) ७ इमारतींवर बुलडोजर चालविण्यात आला. उर्वरित सर्व धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना महानगर पालिकेतर्फे त्वरीत स्थलांतरीत होण्याकरिता अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच नागरिकांना स्थलांतरीत होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

इमारतधारकांना बजावण्यात आलेल्या नोटीसांध्ये इमारत शिकस्त व जीर्ण झाल्याचे नमूद करण्यात आल्याचे म्हटले आहे. इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबियांना अन्य सुरक्षित स्थळी त्वरित स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर शहरातील झोन क्र. १ अंतर्गत ६, झोन क्र. २ अंतर्गत ८ तर झोन क्र. ३ अंतर्गत १ इमारत अतिधोकादायक आहे. या सर्व इमारतींना ३० वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. या 15 इमारतींपैकी ७ इमारतींवर बुलडोजर चालवून पाडण्यात आल्या आहेत. उर्वरित इमारतींमध्ये निवास करणाऱ्या कुटुंबियांना तात्काळ घरे रिकामे करण्याबाबत दोनदा यापूर्वी नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ही नोटीस अंतिम असल्याचे सांगण्यात येत आहे.

महानगरपालिका हद्दीतील बापट नगर, नगिनाबाग, नागपूर रोड, गौतम नगर, रामाला तलावाजवळील १ व मिलन चौक येथील २ इमारती अशा एकूण ७ अतिधोकादायक इमारती पाडण्यात आलेल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या धोरणानुसार शहर व उपनगरातील सर्व खासगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यात ज्या इमारती तत्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे, अशा अतिधोकादायक म्हणून गणल्या जातात. त्यानुसार या अतिधोकादायक इमारतींना नोटीस देऊन कारवाई करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी घुटकाळा वार्डातील एकोरी प्रभाग क्र. १० मधील एक अतिधोकादायक इमारत पत्त्यासारखी कोसळून एक व्यक्ती जखमी झाला, तर मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊन जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता महानगर पालिका प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. त्यामुळे सात इमारतींवर बुलडोजर चालविला तर उर्वरित इमारतींवर लवकचर चालविल्या जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. धोकादायक इमारतींचा वापर थांबवून तात्काळ ‘त्या’ ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या कुटुंबियांना स्थलांतरित होण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा :  

Back to top button