नागपूर : लम्पीमुळे पूर्व विदर्भात ४४ जनावरांचा मृत्यू | पुढारी

नागपूर : लम्पीमुळे पूर्व विदर्भात ४४ जनावरांचा मृत्यू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पूर्व विदर्भात लम्पीमुळे ४४ जनावरांचा मृत्यू झाला असून आठ प्रकरणांत नुकसानभरपाई देण्यात आली आहे. विभागात २० लाख ५५ हजार ४७६ पशुधन असून चार जिल्ह्यांत लंम्पीची लागण झाली आहे. २५ तालुक्यांतील १९९ गावातील १९२२ पशुधन बाधित आहे. विभागात लसीकरणासाठी २० लाख २५ हजार ६०० लशी मिळाल्या असून १७ लाख १४ हजार ६८० जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय विभागाने दिली आहे.

लम्पी त्वचा रोगामुळे मृत्‍यू झालेल्‍या जनावरांना शासकीय परिपत्रकानुसार मदत दिली जाते. गाय आणि म्हैस मरण पावल्यास ३० हजार रूपये, बैल मरण पावल्यास २५ हजार आणि वासरू मरण पावल्यास १६ हजार रूपये मदत दिली जाते. आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात ‘लम्पी स्किन आजरा’मुळे आतापर्यंत ५७ हजाराहून अधिक पशूंचा मृत्यू झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीमेला गती देण्यात आली आहे. देशात अनेक राज्यांमध्ये लम्पीचा कहर वाढत आहे. देशात १५ राज्यांत १७५ जिल्ह्यांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे. १५ लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे.

लम्पी त्वचा रोग हा कीटकांपासून पसरतो. २०१९ मध्ये प्रथम भारतात या व्हायरसची लागण झाली होती. माश्या आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच उवांमुळे हा रोग पसरतो. यामुळे ताप येणे, त्वचेवर गाठी येणे अशी लक्षणे दिसून येतात. यामुळे प्राण्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. यापूर्वी कोणतेही विषाणू संसर्ग झाला नसलेल्या प्राण्यांना याचा सर्वाधिक धोका आहे. लम्पीच्या लक्षणांमध्ये ताप, डोळे आणि नाकातून स्त्राव, जास्त लाळ, पशूंच्या शरीरावर फोड येणे आणि दुधाचे उत्पादन कमी होणे, अशीही लक्षणे दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये गुरांना खाण्यास त्रास होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

हेही वाचा :

Back to top button