चंद्रपूर : वीज पडून शेतक-याचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : वीज पडून शेतक-याचा मृत्यू

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : शेतात रोवणी करण्यासाठी गेलेल्या एका 42 वर्षीय शेतक-याचा शुक्रवारी दुपारच्या सुमारास अंगावर वीज पडून मृत्‍यू झाला. शुक्रवारी दुपारी या भागात विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस झाला. या पावसादरम्यान शेतात काम करत असताना विलास रामुजी आलाम यांच्यावर वीज कोसळली यामध्ये जागीच त्‍यांचा मृत्यू झाला. ही घटना मुल तालुक्यातील दहेगांव येथे घडली.

मूल तालुक्यातील दहेगांव येथील विलास रामुजी आलाम (वय 42) यांची चक दहेगाव परीसरात शेती आहे. त्यांच्या शेतात रोवणीचे काम सुरू असल्याने ते शेतावर गेले होते. शेतात काम करीत असताना शुक्रवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. यावेळी विलास आलाम यांच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिस व महसूल विभागाला मिळताच अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. व घटनेचा पंचनामा केला. मृत विलास आलाम यांच्या कुटुंबीयांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. घरचा कर्ताच गेल्याने कुटुंबांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. काबाड कष्ट करून त्यांच्याच जीवावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता मात्र त्यांचाच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा

Back to top button