नितीनजी तुम्ही गोष्टी खूप प्रेमळ करता, पण त्या पत्रावर सीएम ठाकरे काय म्हणाले? | पुढारी

नितीनजी तुम्ही गोष्टी खूप प्रेमळ करता, पण त्या पत्रावर सीएम ठाकरे काय म्हणाले?

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सीएम ठाकरे : कोणत्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारे जनतेच्या विकासाच्या कामाच्या आड कोणालाही येऊ देणार नाही, अशी निसंदिग्ध ग्वाही उद्धव ठाकरे यांनी मेट्रो फ्रिडम पार्क स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना दिली.
सीएम ठाकरे व्हिडीओ लिंकद्वारे सहभागी झाले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भाषणाच्या सुरूवातीला मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींनी त्यांना लिहीलेल्या पत्राचा उल्लेख केला. ‘नितीनजी तुम्ही गोष्टी खूप प्रेमळ करता. पण पत्र खूप कडक लिहिता’ असा उल्लेख करीत विकासाच्या आड कोणाला येऊ देणार नाही, अशी ग्वाही सीएम ठाकरे यांनी दिली.

 

आपण दोघेही कर्तव्य कठोर आहोत. शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की जनतेशी कधीही विश्वासघात व गद्दारी करायची नाही. जनतेच्या कामात कुठलाही अडथळा येऊ द्यायचा नाही. हीच शिकवण तुम्ही आणि आम्ही घेतली आहे.
नागपूर उपराजधानी म्हटल्यानंतर जगातील सर्वोत्तम शहरात त्याची गणना व्हावी यासाठी आमचेही प्रयत्न आहेत. माणसे जाेडताना राजकीय जोडे बाहेर काढून येतो, हीच आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. विकासाच्या मार्गात कारभाराचे स्पीड ब्रेकर येऊ देत नाही. प्रगती आणि विकास जलद गतीने साधण्यासाठी मार्ग आणि महामार्गाचे जाळे विणत आहोत. त्यात उणीवा वा त्रूटी राहू नयेत. प्रत्येक पावलावरती प्रत्येक क्षणी आपण सोबत आहोत, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

रस्ते विकासाकरीता एक लाख कोटी देण्याची तयारी : नितीन गडकरी

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मेट्रोचा शुभारंभ झाला. त्या नंतर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी याला गती दिली.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनीही कामे मार्गी लावली या बद्दल गडकरींनी कृतज्ञता व्यक्त केली.
देशभरात कामे करीत असलो तरी मराठी माणूस म्हणून महाराष्ट्राकडे विशेष लक्ष आहे.
मुंबई आणि ठाण्यातील विकास कामांसाठी अतिरिक्त १ लाख कोटी देण्याची तयारी आहे. यासाठी एमएसआरडीसीची मुंबईत बैठक बोलवा, असे गडकरी यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने साेबत काम करू. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्र बदलत आहे, असे कौतुकोद्गार गडकरींनी काढले.
यावेळी सर्व उपस्थितांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी मेट्रोचा प्रवास केला.
हे ही वाचलं का?

Back to top button