गडचिरोली : शेतात धानपिकाला पाणी देण्यासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार
गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा : धानपिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेलेल्या एका महिलेला वाघाने ठार केल्याची घटना आज (दि.१३) सकाळी ७ च्या सुमारास आरमोरी तालुक्यातील अरसोडा गावानजीक घडली. नलू बाबूराव जांगडे (वय ३५, रा. अरसोडा) असे मृत महिलेचे नाव आहे.
नलू जांगडे हिच्या पश्चात पती व तीन मुली आहेत. पती आजारी असल्याने नलू आज सकाळी उन्हाळी धानपिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेली होती. मात्र, बांधाआड दडून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. यात ती गतप्राण झाली. ही बातमी कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी वाघ त्याच परिसरात होता. आरडाओरड करुन नागरिकांनी वाघाला पिटाळून लावले. घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
१० दिवसांतील दुसरी घटना
३ मेरोजी देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूरनजीकच्या जंगलात मैत्रिणीसोबत गेलेल्या युवकास वाघाने ठार केले होते. त्यानंतर शेजारच्या आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथे आज वाघाने महिलेस ठार केले आहे. १० दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने दोन्ही तालुक्यांतील नागरिक भयभीत झाले आहेत.
हेही वाचलंत का ?