गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, गुन्हा नोंद असणाऱ्या मनसे नेत्यांनी पोलिसांना शरण यावे | पुढारी

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, गुन्हा नोंद असणाऱ्या मनसे नेत्यांनी पोलिसांना शरण यावे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि.१०) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मनसेच्या कार्यकर्त्यांना दहशतवाद्या सारखे शोधत असल्याचे म्हटले आहे. आरोपीला शोधणे हे पोलिसांचा कामच आहे. पोलीस आपले काम करत आहे. ज्या मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांनी ताबडतोब पोलिसांकडे शरण आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. शिवाय कसे वागावे याचे मार्गदर्शनही राज ठाकरे यांनी करावे, असा खोचक टोलाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लगावला. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

फरार असलेल्या मनसे नेत्यानी शरण आले पाहिजे. पोलीस कायद्याप्रमाणे आपले काम करत असतात. त्यामध्ये चुकीचे काहीही नाही. पोलीस आपल्या पद्धतीनेच काम करणार आहेत. त्यामुळे कोणीही नाराज होण्याचे कारण नाही, असे उत्तरही गृहमंत्र्यांनी राज ठाकरेंना दिले. नागपूरच्या रेल्वे स्टेशनव परिसरात स्फोटके आढळली आहेत. त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. परंतु अजूनपर्यंत त्या तपासात स्पष्टता आलेली नाही. तेच हरियाणा येथील खलिस्तानी प्रकरणात पोलीस पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. जे आरोपी सापडलेले आहेत, त्यांची कस्टडी महाराष्ट्र पोलिसांनी मागितली असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी सांगितले.

Back to top button