यवतमाळ : पूर्ववैमनस्यातून तरुणाला पाजले विष : पाच जणांना अटक | पुढारी

यवतमाळ : पूर्ववैमनस्यातून तरुणाला पाजले विष : पाच जणांना अटक

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ तालुक्यातील घाटाना येथे पूर्ववैमनस्यातून तरुणांमध्ये भांडण झाले. यामध्ये पाच जणांनी मिळून एका तरुणाला  विषारी औषध पाजले. त्‍याचा मृत्यू झाला. अंकुश विजय जाधव (वय २८) रा. घाटाना ता. यवतमाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी संजय दासू चव्हाण, चेतन संजय चव्हाण, चिरंजीव संजय चव्हाण, रोशन मनोज चव्हाण आणि करण मनोज चव्हाण रा. लोणी या पाच जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार,  घाटाना येथील अंकुश जाधव आणि संजय दासू चव्हाण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. अंकुश हा २२ मार्च रोजी घाटाना शेतशिवारात गेला असता, संजयने आपल्या अन्य चार साथीदारांसह त्याला शेतशिवारात गाठले. अंकुशचे हातपाय पकडून त्याला बळजबरीने विष पाजले. नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्‍यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणातील पाच ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, एसडीपीओ संपतराव भोसले, ठाणेदार पवन राठोड, पीएसआय भास्कर दरणे, धनंजय शेकदार, गणेश आगे, नीलकमल भोसले, अक्षय डोंगरे यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button