चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रातून घरी येणाऱ्या कामगाराला वाघाने नेले फरफटत | पुढारी

चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रातून घरी येणाऱ्या कामगाराला वाघाने नेले फरफटत

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा 

चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर येथील औष्णिक महावीज केंद्रातून घरी परतणाऱ्या एका कामगाराला पट्टेदार वाघाने उचलून नेले. काल (बुधवार) रात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना समोर आली. अद्यापही त्या कामगाराचा शोध लागलेला नाही. भोजराज मेश्राम (वय 59, रा. वैद्यनगर तुकुम) असे कामगाराचे नाव आहे. या घटनेने वैद्य नगर तुकूम व महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात एकच खळबळ उडाली.

भोजराज मेश्राम (रा. वैद्यनगर तुकुम) हे वीज निर्मिती केंद्रात कामगार म्हणून कार्यरत आहेत. काल (बुधवार) दिवसा ते कामावर गेले होते. दरम्यान रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ते घरी परत येत असताना पट्टेदार वाघाने त्यांना उचलून नेले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या परिसरात वाघांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. दिवसागणिक नागरिकांना वाघाचे दर्शन होणे ही नित्याची बाब झालेली आहे. अशातच महाऔष्णिक वीज केंद्रात काम करणा-या कामगाराची घटना समोर आल्याने एकच दहशत निर्माण झाली आहे.

वैद्यनगर तुकुम हा परिसर महाऔष्णीक वीज केंद्राला लागूनच आहे. भोजराज मेश्राम हे सिटीपीएस मधील कुणाल कंपनीत काम करीत होते. युनिट क्र 8 व 9 मधील बेल्टचे काम करीत असल्याची माहिती आहे. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास ते काम आटोपल्याने घराकडे येत असताना रस्त्यावरच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्‍यांना उचलून नेल्याची माहिती समोर आली आहे. अजूनपर्यंत त्‍यांचा मृतदेह मिळालेला नाही.

Back to top button