

Tukaram Mundhe: आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि कामासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी भेसळखोरांविरोधात राज्यभरात कारवाईचा धडाका लावला आहे. त्यांच्या या कामामुळे एका बाजूला नागरिकांकडून कौतुक होत असताना दुसरीकडे विभागातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.
या सगळ्या चर्चेदरम्यान तुकाराम मुंढे यांच्या एका मुलाखतीतील उत्तराने मात्र राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कोणता मुख्यमंत्री तुम्हाला अधिक चांगला वाटतो? असा थेट प्रश्न त्यांना विचारण्यात आला. मात्र, मुंढेंनी कोणत्याही मुख्यमंत्र्याचे नाव घेण्याऐवजी मिश्किल उत्तर देत प्रश्नालाच वेगळं वळण दिलं.
मुलाखतीत त्यांना त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील पोस्टिंगच्या अनुभवाचा संदर्भ देत तीनही मुख्यमंत्र्यांबाबत मत विचारण्यात आलं. त्यावर तुकाराम मुंढे म्हणाले, “मला तुमचा रिसर्च जास्त चांगला वाटतो.”
त्यांच्या या उत्तरामागे त्यांच्या स्वतःच्या पोस्टिंगच्या अनुभवाचा संदर्भ होता. मागील काही सरकारांच्या काळात आपल्याला दीर्घकाळ पोस्टिंग मिळाली नसल्याचा उल्लेख त्यांनी केला. मात्र, कोणत्या सरकारने आपल्याला पोस्टिंग दिली किंवा दिली नाही, याचा हिशोब आपण कधी केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंढे यांनी सांगितलं की, त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांना ‘वेटिंग’वर राहण्याचा अनुभव आला होता. मात्र, त्यामागचं कारण आपल्यालाही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांना दीर्घकाळ पोस्टिंगशिवाय ठेवणं हे संबंधित अधिकारी आणि सरकार या दोघांसाठीही योग्य नसल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं.
तुकाराम मुंढे यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांच्याभोवती तयार झालेला चाहतावर्ग हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे त्यांना आदर्श मानणाऱ्या लोकांनी त्यांना का फॉलो करावं, असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर मुंढेंनी मात्र स्वतःला ‘फॉलो’ करण्याचं आवाहन करण्याऐवजी प्रत्येकाने स्वतःच्या विचारांना आणि विवेकाला महत्त्व द्यावं, असा मेसेज दिला.
प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मतः काही ना काही क्षमता असते. ती ओळखून त्यावर काम करणं महत्त्वाचं असल्याचं मुंढेंनी सांगितलं. माणूस जन्मतः चांगला किंवा वाईट नसतो; त्याची जडणघडण कुटुंब, शिक्षण आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणातून तो घडतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आजूबाजूच्या वातावरणातून आपण कोणत्या गोष्टी स्वीकारतो, यावर आपल्या व्यक्तिमत्त्वावर चांगले किंवा वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची अंध अनुकरण करण्याऐवजी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यावर भर द्यायला हवा, असा मेसेज त्यांनी दिला.
विशेष म्हणजे, स्वतःच्या मुलांनीही आपलं अनुकरण करू नये, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं. त्याऐवजी त्यांनी स्वतःचं व्हिजन ठरवावं, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवावा आणि समाजातही सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करावा, असं त्यांनी सांगितलं.
त्यांच्या या भूमिकेमुळे मुलाखतीतील हा भागही चर्चेत आला आहे. एकीकडे राजकीय नेतृत्वाबाबत थेट मत व्यक्त करण्याचा प्रश्न टाळत त्यांनी मिश्किल उत्तर दिलं, तर दुसरीकडे तरुणांनी स्वतःची ओळख आणि विचार विकसित करावेत, असा स्पष्ट मेसेज दिला.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळखोरांविरोधातील कारवायांना वेग आला आहे. खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईची राज्यभर चर्चा आहे.
याच काळात विभागातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरोधात मंत्र्यांकडे तक्रार केल्याची माहितीही समोर आली होती. पण मुख्यमंत्र्यांच्या पसंतीच्या प्रश्नावर कोणाचंही नाव न घेता दिलेलं त्यांचं मिश्किल उत्तर आणि “स्वतःच्या व्हिजनला फॉलो करा” हा दिलेला मेसेज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.