

Amba Festival
ठाणे : यंदा असह्य उकाड्यातही ठाणेकरांना आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच,संस्कार संस्था व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने १ मे ते १२ मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्कारचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, यंदा शेतकऱ्याच्या हाती फक्त ३० टक्केच आंबा लागला असून निर्णयात ही घटत असल्याची चिंता व्यक्त करीत सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. आंबा महोत्सवाचे हे यंदाचे १८ वे वर्ष आहे. यावेळी मुख्य आयोजक आ. संजय केळकर यांच्यासमवेत कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, संतोष साळुंखे, विष्णू रानडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संजय केळकर यांनी दरवर्षी होणारा हा आंबा महोत्सव म्हणजे व्यापारी पेठ नसुन एक चळवळ आहे. गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाला लाखो ग्राहक भेट देत असतात. तेव्हा, आंबा महोत्सवात जास्तीत जास्त खरेदी करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे असे आवाहन करून आ. केळकर यांनी याठिकाणी प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध आहे. तरी, कोकणातील अस्सल हापुस आब्यांसाठी खवय्यांनी राजेंद्र तावडे ९८६९०१६०९२ आणि दिनेश मांजरेकर ९८१९०९७६५० या क्रमांकावर संपर्क साधावा,असेही त्यांनी सांगितले.
कोकणात १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकतो. यंदा अवकाळी पाऊस,ढगाळ हवामान तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे. दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन यंदा अवघे ३० टक्के आंबा उत्पादन झाले आहे. २०२२ साली कोकणातील आंब्याचे उत्पन्न ३ लाख २० हजार मेट्रीक टन होते. यातील २६० कोटी रुपयांची आंब्याची विक्री झाली आणि १०० कोटीचा आंबा निर्यात केला गेला. २०२३ मध्ये २,५६,००० मेट्रीक टन होते आणि १९८ कोटींचा आंबा विकला गेला आणि ७९ कोटीच्या आंब्याची निर्यात केली गेली, २०२४ मध्ये हे उत्पादन १,२८,००० मेट्रीक टन झाले असून १२६ कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली आणि ५४ कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. त्यामुळे गेल्या काही वर्षापासुन कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे.