

दिलीप शिंदे
ठाणे: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १० हजार ९६२ शेतकरी पात्र झाले असून ७ हजार ४५४ शेतकरी अपात्र ठरले आहेत. आज ठाणे जिल्ह्यातील ८ हजार ६४९ शेतकऱ्यांना ४५ कोटीची कर्जमुक्ती मिळाली असून पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८ कोटी मिळाले आहेत. केवायसी केलेली अद्याप १ हजार ९६५ शेतकऱ्यांनी केवायसी केलेले नसल्याने अदयाप कर्जमाफी होऊ शकलेली नाही.
ठाणे जिल्ह्यातील १८ हजार ८६ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १० हजार ६१४ शेतकरी पात्र झाले आहेत. या पात्र शेतकऱ्यांपैकी ८ हजार ६४९ केवायसी केलेली आहे. त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम वर्ग झाली आहे.
जिल्हा बँकेमधून १० हजार ५२५ आणि राष्ट्रीयकृत बँकेतून ८९ शेतकऱ्यांना रक्कम दिली जाणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेतील कर्जदार १ हजार २३२ शेतकऱ्यांपैकी फक्त ८९ शेतकरी पात्र झालेले आहेत.
जिल्ह्यातील १ हजार ११६ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेली नाही. ही आयडी काढण्यासाठी मुदत देण्यात आली असून सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल.