

ठाणे: मुंबई महानगर प्रदेश आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता असलेला प्रदेश आहे. नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासातून सुमारे १.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता व्यक्त केली आहे.
या क्षमतेचा प्रभावी उपयोग करून मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजित, शाश्वत आणि जागतिक दर्जाचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत भागीदारी करण्यास सुरुवात केली आहे. यातून तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय डेटा सेंटरही तिसऱ्या मुंबईच्या कक्षेत होत आहे.
तिसऱ्य मुंबईत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा करार यापूर्वी झाला आहे. त्याचबरोबर डेटा सेंटरसाठी राज्य सरकारने १०० एकर जागा दिली आहे. त्यामुळे येथे विस्ताराला मोठी चालना मिळणार आहे. पाच आंतरराष्ट्रीय विद्यापिठांनी येथे आपले अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन केले असून काही विद्यापिठांचे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, तर काहींचे सुरू होणार आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि मुंबई महानगर प्रदेशातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे रायगड परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर रायगड-पेण ग्रोथ सेंटर आणि ‘थर्ड मुंबई’ अर्थात मुंबई ३.० च्या विकासासाठी सिंगापूरमधील नामांकित संस्था आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसोबत करण्यात आलेले करार महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी शासनाने आखलेले नियोजन आता प्रत्यक्षात येत आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे देश-विदेशातील गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावरील विश्वास वाढत आहे. सिंगापूरला शहरी नियोजन, पायाभूत सुविधा व जागतिक दर्जाची शहरे विकसित करण्याचा मोठा अनुभव आहे. याचा लाभ महाराष्ट्राच्या विकासासाठी होईल.
रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा विकास प्रकल्प
रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड आणि मॅपलट्री यांच्यात १०० एकरांच्या मिश्र-वापर विकास प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले. या प्रकल्पामध्ये मॅपलट्रीकडून विकासासाठी आवश्यक भांडवली व कार्यकारी भांडवल गुंतवणूक, मूल्यनिर्मिती, देश-विदेशातील गुंतवणूकदार आणि जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या
व्यवहारातून रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १.१ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक परकीय थेट गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे. यामुळे परिसरातील औद्योगिक, व्यावसायिक आणि नागरी विकासाला मोठी चालना मिळणार आहे.