

ठाणे: ठाणे शहर झपाट्याने विस्तारत आहे. ठाणेकरांच्या मागणीनुसार मनोरंजनासाठी घोडबंदर वाघबीळ येथे राज्यातील सर्वात मोठे ‘तीर्थरुप निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ उभारण्यात येत आहे. सुमारे 2500 प्रेक्षक क्षमतेचे हे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक मोठी देणगी ठरणार आहे.
सदर नाट्यगृहाचे भूमिपूजन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच करण्यात आले आहे. परंतु निधीअभावी या नाट्यगृहाचे काम रखडले होते. आता राज्य शासनाने या प्रकल्पासाठी एकूण 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून तसा शासन निर्णय काढण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात 85 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 53 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, येत्या तीन वर्षात हे नाट्यगृह ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल.
नाट्यगृहाच्या परिसरातील सुमारे 60 टक्के जागा मोकळी ठेवून सुमारे 2000 चौरस मीटरचा प्रशस्त प्लाझा उभारण्यात येणार आहे. या प्लाझामध्ये एकावेळी 1500 ते 2000 नागरिक उभे राहू शकतील तसेच लाईव्ह इव्हेंट्स, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिसरात आकर्षक गार्डनही विकसित केले जाणार आहे. वाहनतळाची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 650 चारचाकी आणि 300 दुचाकींसाठी पार्किंगची सोय असेल. याशिवाय तीन मजल्यांची पार्किंगची सुविधा दिली जाणार आहे.
नाट्यगृह ठरणार सांस्कृतिक वैभव
नाट्यगृहाच्या देखभालीसाठी हे उत्पन्न महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकल्पाच्या नियोजनासाठी लवकरच रंगकर्मी, दिग्दर्शक आणि कलाकारांची बैठक घेण्यात येणार असून, त्यांच्या सूचनांनुसार पुढील कामाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. हे नाट्यगृह केवळ ठाण्यासाठी नव्हे, तर आपल्या राज्यासाठी सांस्कृतिक वैभव ठरणार आहे, असा विश्वास यानिमित्ताने सरनाईक यांनी व्यक्त केला.