

ठाणे : श्रमजीवीच्या हजारो आदिवासी स्त्री-पुरुषांच्या, तरुण-तरुणींच्या सहभागामुळे ठाणे शहर आज निर्धाराच्या क्रांतीने पेटून उठले. आदिवासी कातकरी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी सुरू झालेल्या श्रमजीवी संघटनेच्या “आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे” या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. यावेळी 26 जानेवारी 2026 पर्यंत सर्व गावठाणातील कातकरी बांधवांना घरकुल मिळाले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून हक्क स्वतःच्या हाताने हिसकावून घेऊ, असा निर्धार संघटनेने व्यक्त केला.
यावेळी प्रा. सदानंद वर्दे, माजी शिक्षण मंत्री आणि समर्थन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. सदानंद वर्दे यांना जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. दरम्यान आत्मनिर्धार करण्यासाठी आज पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून हजारो श्रमजीवी निर्धार मोर्चा घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर वस्तीच्या तयारीत, जेवणासाठी फाट्या लाकूड घेऊन रॅली काढून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
यावेळी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्रमजीवीच्या निर्धार आंदोलनाला भेट दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रमजीवीच्या सभासदांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत, “40 वर्षांपासून च्या मूलभूत मागण्या न्याय्य असून त्या सरकारच्या लक्षात आहेत. त्यावर चर्चा करून तातडीने तोडगा काढू, असे आश्वासन दिले.
समाजाच्या अस्तित्वासाठी परिवर्तनासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना आत्मक्लेश करावा लागतो, याचे सरकारला दुःख, पश्चाताप आहे,”असे सांगितले. यावर सकारात्मक भूमिका घेत आदिवासी बांधवांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मंगळवारी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्रमजीवीच्या सभासदांशी संवाद साधत प्रलंबित मागण्या व आदिवासी समाजाच्या अस्तित्वासाठी त्यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले.
घरकुल न दिल्यास हक्क श्रमजीवी संघटनेने इशारा दिला की, सरकार काही करेल या भ्रमात राहायचं नाही. 1976 मध्ये अस्तित्वात आलेल्या कायद्याची आजवर अंमलबजावणी झाली नसल्याने 26 जानेवारी 2026 पर्यंत सर्व गावठाणा तील कातकरी बांधवांना घरकुल मिळाले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून हक्क स्वतःच्या हाताने हिसकावून घेण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला. कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय सरकार आणि प्रशासनाने घेतल्यासारखा दिसतो. प्रशासनाचे कामगार विभाग आणि महिला व बालविकास विभाग आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरले असून, ते निरर्थक ठरल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले.
पंडित यांनी कातकरींची मांडली खंत
संघटनेचे संस्थापक विवेक पंडित म्हणाले, “2047 चं व्हिजन सांगणारं सरकार, तेव्हा कातकरी अस्तित्वात तरी राहतील का?”जर आजच्या घडीला त्यांचा जमिनीचा, घरकुलाचा व जगण्याचा हक्क सुरक्षित केला नाही, तर 2047 पर्यंत हा समाज नकाशावरूनच पुसला जाईल, अशी खंत व्यक्त केली आहे. दरम्यान आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे या आंदोलनाला आलेल्या श्रमजीवीच्या हजारो सभासदांनी चुली पेटवून एकत्र जेवण केले. त्यानंतर पारंपरिक गौरी, तारपा, डबा नाच नाचून आनंद साजरा केला. त्यानंतर आत्मनिर्धाराचा नवा निर्धार घेऊन सभासद परतले.