

ठाणे : पुढारी वृत्तसेवा
कोकणात शेवटच्या टप्प्यात किती पाऊस पडतो याची उत्सुकता लागली आहे. यावेळी पेरण्या उशिरा झाल्याने आणि लावणीची कामे उशिरा झाल्याने भात कापणी १५ दिवसांनी पुढे गेली आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये पाऊस झाला तरच शेती तगणार आहे. आणि सप्टेंबरमध्येही पाऊस येणार असल्याची आनंदवार्ता आता समोर आली आहे.
२० ते २४ ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस पडेल असे वेधशाळेच्या अंदाजात म्हटले आहे. उत्तर आणि पश्चिम भारतात पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करेल, असे चित्र आहे. त्याबाबतचे अनुकूल वातावरणही पाहायला मिळत आहे.
हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या २० ऑगस्ट ते २४ ऑगस्ट दरम्यान पूर्व भारतामध्ये पावसाचा एक अत्यंत सक्रिय टप्पा पाहायला मिळणार असून अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस व्यापून टाकेल, असे चित्र आहे. देशाच्या काही भागांत पावसाचा जोर ओसरला असला, तरी मान्सूनचा नवा अंदाज आता समोर आला आहे. बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे २० ते २४ ऑगस्ट या कालावधीत पूर्व भारतात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर आणि पश्चिम भारतातील विश्रांतीनंतर हा मान्सूनचा नवा सिझन सुरू होणार आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबरमध्ये सुरू होतो. मात्र पावसाचे आगमन जून अखेरीमध्येच झाले असल्याने यावेळचा पाऊस ऑक्टोबरपर्यंत पुढे सरकण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात पावसाची विश्रांती होती. त्यामुळे श्रावण सरी फारशा बरसल्या नव्हत्या. आता २० ते २४ ऑगस्ट दरम्यान श्रावण सरी बरसतील असा अंदाज आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सॅटेलाईट फोटोंमध्ये पूर्व आणि मध्य भारतावर मोठ्या प्रमाणावर ढगांची गर्दी आणि हालचाली दिसून येत आहेत. हे संकेत देशात पुन्हा एकदा सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू होणार असल्याचे दाखवत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचं दिसत आहे.
मान्सूनच्या या दुसऱ्या धमाक्याला बंगालच्या उपसागरातून जमिनीच्या दिशेने सरकणारा कमी दाबाचा पट्टा महत्वाचा ठरणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, येणारे दिवस उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि छत्तीसगडसाठी या महिन्यातील सर्वात महत्त्वाचे मान्सूनचे दिवस ठरू शकतात; कारण या राज्यांमध्ये वारंवार पावसा अंदाज आहे.
‘या’ पावसाची मोठी तूट नोंदवली
हवामान शास्त्रज्ञांच्या मते, 20 ते 24 ऑगस्ट दरम्यानचा हा कालावधी मान्सूनच्या एकूण सरासरी पावसासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो; विशेषतः अशा राज्यांसाठी जिथे अद्यापही पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. पावसाच्या या नवीन स्पेलमुळे (टप्प्यामुळे) गंगा-यमुनाचे मैदानी प्रदेश आणि मध्य भारताच्या काही भागांमध्ये पावसाचे वितरण सुधारण्यास मोठी मदत होऊ शकते.