

दिनेश कांबळे
डोळखांब : शहापूर तालुक्यातील ग्रामिण भागात भात कापणी झाली की, पोटाची खळगी भरण्यासाठी ‘दार उघड बया दार’ अशी आर्त आरोळी देत पाठीवर आसुड ओढत भिक्षा मागणारा पोतराज समाज आजही शासन दरबारी उपेक्षीत असल्याचे पाहायला मिळते.
पोतराज समाज म्हणजे पुरुष वेषातील व्यक्तीने स्री ची वेषभुषा करीत डोक्यावर मरी आईचा पेटारा घेऊ न स्वतःचे केस मोकळे सोडून दारोदारी जाऊ न लोकांना आशीर्वाद देणारी व आधार देणारी जमात मानली जाते. विशेषतः विदर्भातील ग्रामिण भागात हे लोक मोठ्याप्रमाणात आढळतात. राज्यातील ठाणे-पालघर जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, वाडा, मोखाडा, भिवंडी या ठिकाणी दिवाळीनंतर भातकापणी झाली की, शेतकऱ्यांकडे दोन पैसे येतात. यावेळी या पोतराज समाजातील मरी आईच्या भक्तांची धान्य, पिठ किंवा आर्थिक स्वरूपात पोस्त मागणे सुरू होते.
यावेळी लोकांना भविष्य सांगणे, पुढील भविष्यवाणी वर्तविणे किंवा आशीर्वाद देऊ न लोकांना धीर दिला जातो. लोक देखील यांना लोकांना आर्थिक स्वरूपात पोस्त देत असतात. यावरच या लोकांचा पावसाळी चार महिने किंवा वर्षभराचा उदरनिर्वाह होत असतो. असे असले तरी मूलभूत गरजा आणि उदर निर्वाह तसेच निवारा, मुलांचे शिक्षण या मूळ प्रवाहापासून ही जमात उपेक्षीतच आहे.
ऊन, वारा, थंडी या कशाचीही पर्वा न करता प्रत्येक ठिकाणी दार उघड बया दार, हा आवाज देत पाठीवर आसुडाचे फटके घेतले जातात, हे विदारक चित्र कुणालाही न आवडणारे आहे. पोतराज हा तसा उत्तर भारतातील द्रविड शब्द मानला जातो. आणि पोतराज ही लोककला जोपासणारी कलावंताची जमात देखील ओळखली जाते.
हा सर्व प्रकार करत असताना स्वतःला कोणतीही सुरक्षा नसताना गावाबाहेर कापडी पाल टाकून अडीअडचणीत या लोकांना राहावे लागत असते. परक्या ठिकाणी राहताना उलट त्यांनाच स्थानिक ग्रामपंचायत किंवा पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावी लागते. मजल-दरमजल करीत स्वतःचे जीवन जगतांना विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊनच फिरावे लागते.