डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : पावसाने मागील आठवड्यात दांडी मारल्याने शहरात नवरात्री उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. मात्र आज सकाळपासून मुसळधार पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. तर अनेक दुकानामध्ये पाणी घुसले आहे. यामूळ नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
दरम्यान, डोंबिवलीत अवघ्या काहीच तासात 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळीपासूनच काही ठिकाणी तुरळक पाऊस होता. दरम्यान दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. रस्त्यावरील गटारे तुडुंब भरल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होवून रस्तेही तुडुंब भरले. पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने सर्वच रस्ते जलमय झाले आहेत.
पूर्वेकडील स्टेशन परिसर पूर्णपणे जलमय झाला असून उर्सेकरवाडी, केळकर रोड, मानपाडा रोड, नेहरू रोड परिसरात आणि बाजूचा सखल भाग तुंबून गेला होता. पश्चिमकडील जुनी डोंबिवली शंकर मंदिर परिसर, महात्मा फुले रोड, गोपी सिनेमा विभाग, गुप्ते रोड, रेतीबंदर रोड या भागातील लोकांना पावसामुळे तारांबळ उडाली.
गेल्या काही दिवसात पाऊस थांबल्याने रस्त्यांवर पडलेले खड्डे पुन्हा भरण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने तयारी सुरू केली होती. मात्र आज झालेल्या या पावसाने केडीएमसीच्या या तयारीवर पाणी फेरले.
हेही वाचा