नेवाळी; पुढारी वृत्तसेवा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला असून पुढे ढकलण्यात आला आहे. यावरून सर्व पक्षीय नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शुक्रवारी सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत मनसेला टोला लगावला होता. आता यावर मनसे आमदार राजू पाटील (raju patil) यांनी उत्तर देत प्रतिटोला लगावला आहे.
पाच जूनसाठी राज ठाकरेंना काही सहकार्य हवं असतं, तर आम्ही केलं असतं, अयोध्या दौरा कशाला रद्द केला, असा टोला राऊत यांनी लगावला होता. यावर आमदार पाटील (raju patil) म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे दौरा रद्द झाला नाही आहे, पुढे ढकलण्यात आला आहे. आम्हाला त्यांच्या मदतीची गरज नाही, त्यांना कदाचित दुःख वाटलं असेल, कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल. त्याचं राजकारणचं हित साध्य झालं नसेल. पुन्हा एकदा यांना सुपारी द्यावी लागेल, त्याचे दुःख वाटले असेल. राज साहेबांच्या तब्येतीच्या कारणास्तव हा दौरा स्थगित केला आहे, असे पाटील म्हणाले.
काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी आम्ही अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहोत, दौऱ्यासाठी नाही, असं विधान केलं होतं. यावरही आमदार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या नावातच लोंढे आहे. त्यांना लोंढे घेऊन जायची गरज नाही. म्हणून ते एकटे जाऊ शकतात. त्यांनी कसं जायचं, कसं नाही जायचं, हा त्यांचा विषय आहे.
हेही वाचलंत का ?