

ठाणे: महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, तर मराठी अनिवार्य आहे. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय तुम्हाला करायचा असेल, तर मराठीचं जुजबी ज्ञान आवश्यक आहे. त्यामुळे आता मुदत नाही. सरकारने, ३५ वर्षे वेळ दिलेला आहे. रिक्षा संघटनांच्या मागणीवरून 1 मे 15 ऑगस्ट दरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियान 105 दिवस राबविले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियान राबविण्यात आले आहे. त्यामुळे जे रिक्षाचालक मराठीत बोलणार नाही त्यांच्यावर परिवहन कायद्यानुसार कारवाई अटळ आहे, असा इशाराही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्ममाने राज्यात अमराठी रिक्षा चालकांसाठी हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा शिकवणी अभियान सुरू आहे, त्या अभियानाची सांगता येत्या 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी तसेच या अभियानात सहभागी झालेल्या साहित्य संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
मराठी शिकण्यासाठी 1989 च्या प्रादेशिक परिवहन विभागाचा नियम आहे. या नियमानुसा चालकांना जुजबी मराठी येणे आवश्यक आहे. मी परिवहन मंत्री झाल्यानंतर जुजबी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे, अशी घोषणा केली, कारण बहुतांश ठिकाणी हिंदी भाषिक आणि मराठी भाषेमध्ये संवाद योग्य प्रकारे होत नसल्या कारणाने तक्रारी दाखल होत होत्या, भांडणं होत होती. काही ठिकाणी दादागिरीही हिंदी भाषिक प्रवाशांवर होत होती.
काही प्रवाशांकडून हिंदी भाषिकांवर दादागिरी होत होती. आणि तक्रारींचे प्रमाण वाढलं होते, काही लोकप्रतिनिधींनी तक्रार केली आहे की अशा अशा पद्धतीने काही बांगलादेशी घुसखोर येतात आणि ते रिक्षा ड्रायव्हर किंवा टॅक्सी ड्रायव्हर आहेत, त्यांच्यावर कारवाई करत नाही. असे आरोप झाल्यानंतर परिवहन विभागाने या शिकवणी वर्गाचा निर्णय घेतल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषा अनिवार्य आहे, बॅच देत असताना मराठी भाषेचं ज्ञान असेल, तरच बॅच आणि परवाना दिला जाईल, ही भूमिका त्यावेळेस राज्य शासनाने घेतली होती. ती राज्य शासनाची भूमिका कायम ठेवत, पुढेही जर तुम्हाला मराठी भाषा आली नाही तर आम्हाला नाईलाजाने का होईना पण कारवाई करावी लागेल. ही भूमिका घेतल्याने परिवहन अधिकाऱ्यांनी कारवाई करायला सुरुवात केली. त्यावेळेस अनेक रिक्षा-टॅक्सी संघटनांनी आमच्याशी संवाद साधल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानाचा समारोप १७ ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतन येथे होणार असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
व्यवहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१,३५,००० रिक्षा व टॅक्सी चालकांनी प्रवेश अर्ज
महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे, त्यात सुमारे १,३५,००० रिक्षा व टॅक्सी चालकांनी प्रवेश अर्ज भरले आहेत. सध्या एक लाखाहून अधिक रिक्षाचालक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानात सहभागी झाल्याची माहिती कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ज्योती ठाकरे यांनी दिली.
यावेळी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नमिता कीर, ज्योती ठाकरे, मुंबई मराठी साहित्य संघाच्या सुहासिनी कीर्तीकर, प्रा. दीपा ठाणेकर, हर्षला लिखिते, प्रादेशिक परिवहन विभागाच्या हेमांगिनी पाटील मान्यवर उपस्थितीत होत्या.