

डोंबिवली: श्रावण महिना सुरू होण्याआधीचा मंगळवार ते बुधवार दरम्यान गटारी अमावास्येची समाज माध्यमांवर एकच चर्चा सुरू आहे. या दिवशी मच्छीचे कालवण, चिकनचा रस्सा आणि सोडा-बॉटलच्या बाटल्या आपोआपच ट्रेंडिंग होतात.
त्यामुळेच तरूणाईत या दिवसाला सोडा-बॉटल डे असेही नाव मिळाले आहे. मात्र यंदा समाज माध्यमांवर एकच संदेश व्हायरल होतोय. सावधान ! गटारी जवळ आली आहे. सोडा-बॉटल वृत्ती सिरियस घेऊ नका.
इंस्टाग्रामवर रील्सचा पूर आला आहे. कुणी मित्रांना टॅग करून प्लॅन ठरवतोय, तर कुणी बायकोच्या भीतीने गुपचूप प्लॅन कॅन्सल करतोय. मिम्समध्ये म्हटले जातेय की गटारी म्हणजे एक दिवसाचा परवाना आहे, पण त्याचा गैरवापर नको. एन्जॉय करा पण घरी सुखरूप परत या. हॉटेल आणि बारमध्ये आधीपासूनच बुकिंग फुल होऊ लागली आहे.
मच्छी/मटण मार्केटमध्ये सकाळपासूनच गर्दी वाढली आहे. व्यापाऱ्यांचा सांगण्यानुसार गटारीच्या एक दिवसात होणारी कमाई म्हणजे पूर्ण महिन्याची कमाई असते. तर दुसरीकडे पोलिस आणि केडीएमसी प्रशासनानेही कंबर कसली आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष पथके तैनात केली जाणार आहेत.
डॉक्टरही आवाहन करत आहेत की जास्त तिखट, जास्त तेल आणि जास्त दारूमुळे दवाखान्यात गर्दी नको. श्रावणात एक महिना उपवास आणि शाकाहाराचे व्रत असल्याने गटारीला विशेष महत्व आहे.
त्यामुळे हा दिवस सणासारखा साजरा करा, मित्रांसोबत धमाल करा, फोटो काढा, रील बनवा...पण मर्यादा सोडू नका. कारण गटारीचा खरा आनंद हा दुसऱ्या दिवशी डोकं न दुखण्यात आहे. एकूणच काय तर, सोडा घ्या पण जबाबदारीने घ्या. बॉटल उचला पण घरच्यांचा मान राखा. गटारी आली आहे, एन्जॉय करा...पण सिरियस होऊ नका.