

नेवाळी : गणेशोत्सव म्हटला की डीजेचा दणदणाट, डॉल्बीचा आवाज आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले विविध कार्यक्रम, असे चित्र अनेक बघायला मिळतात. काही ठिकाणी उत्सवाच्या नावाखाली जुगारासारख्या प्रकारांनाही खतपाणी मिळत मिळत असत. मात्र अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागाने याला वेगळीच दिशा दिली आहे.
श्री मलंगगड परिसरातील गावांमध्ये डीजे-डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाऐवजी मृदुंगाचा ठेका, टाळांचा नाद आणि हरिनामाचा जयघोष ऐकू येत आहे. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थी यामध्ये पुढे असल्याने त्यांचे हे उपक्रमाचे आदर्श घेण्यासारखे झाले आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री मलंगगड पट्ट्यातील अनेक गावांमध्ये घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सायंकाळ होताच तरुण मंडळी एकत्र येत गणपती बाप्पासमोर भजन, अभंग आणि हरिनामाचा गजर करत आहेत. विशेष म्हणजे या भजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबत तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
हातात मृदुंग घेतलेली तरुणाई आणि भक्तिरसात रंगलेले गावकरी, असे अनोखे चित्र सध्या ग्रामीण पट्ट्यात पाहायला मिळत आहे. या आधुनिक मनोरंजनाच्या साधनांनी वेढलेल्या आजच्या काळात तरुणाई पारंपरिक भजन-कीर्तनाकडे वळत असल्याने या उपक्रमाची विशेष चर्चा होत आहे. गणेशोत्सव केवळ जल्लोषाचा नव्हे, तर संस्कृती, परंपरा आणि भक्तीचा उत्सवही असू शकतो, हे या गावांनी दाखवून दिले आहे.
भक्तिगीतांची परंपराही पुढे...
श्री मलंगगड भागातील ढोके गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या भजनी मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या या भजन मंडळाला गावामधून देखील साकारात्मनाक प्रतिसाद मिळत असल्याचेच दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे भजनाच्या निमित्त गावातील तरुण एकत्र येत असून, पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या अभंग आणि भक्तिगीतांची परंपराही पुढे नेली जात आहे. त्यामुळे ‘डीजेचा आवाज नको, हरिनामाचा गजर पुरेसा!’ अशी भावना ग्रामीण गणेशोत्सवातून उमटताना दिसत आहे.