

नेवाळी: पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी जमीन हस्तांतरणाच्या निर्णयानिमित्त कल्याण-शीळ रोडवर झळकलेल्या “पिंपळेश्वर तो झांकी है... श्री मलंगगड अभी बाकी है...” या भाजपच्या बॅनरवरून नवा वाद निर्माण झाला आहे. भूमिपुत्र धर्माभिमानी संघाचे ओमकार पावशे यांनी सोशल मीडियावरून भाजप आणि वन विभागाच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित करत मलंगगड मुक्तीबाबत ठोस कृतीची मागणी केली आहे.
पावशे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या भूमिकेत म्हटले आहे की, मलंगगडावरील जमीन व मालमत्ता शासनाच्या नावे असूनही अतिक्रमण आणि व्यावसायिक वापराच्या प्रकरणांमध्ये अपेक्षित कारवाई होताना दिसत नाही. जुलै २०२४ मध्ये वन विभागाने गडावरील अनेक व्यावसायिक बांधकामांवर तोडक कारवाई केली होती. मात्र त्यानंतर संबंधित प्रकरणात शासनाने प्रभावी पाठपुरावा केला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच तोडक कारवाईनंतर शासनाच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आलेल्या काही मालमत्तांचा पुन्हा वापर सुरू असल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी नेमून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्र्यांकडे केली आहे.
भाजप जिल्हाध्यक्षांच्या बॅनरमुळे मलंगगड मुक्तीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रत्यक्ष कृती आणि राजकीय घोषणांमधील तफावतीवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. भूमिपुत्र धर्माभिमानी संघाच्या या भूमिकेमुळे मलंगगड प्रश्नावर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
वातावरण तापण्याची चिन्हे
भाजप जिल्हाध्यक्षांच्या बॅनरमुळे मलंगगड मुक्तीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रत्यक्ष कृती आणि राजकीय घोषणांमधील तफावतीवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. भूमिपुत्र धर्माभिमानी संघाच्या या भूमिकेमुळे मलंगगड प्रश्नावर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.