

ठाणे: राज्यात मराठी भाषा बारावीपर्यंत सक्तीची करण्याचा निर्णय घेऊनही मराठीची पिछेहाट थांबलेली नाही. यंदाच्या दहावी परीक्षेत मातृभाषेची दांडी गुल झाली आणि 94 हजार विद्यार्थी मराठीत नापास झाले. मराठी भाषेचा निकाल 92 टक्के, तर गुजराती भाषेचा निकाल 100 टक्के लागला.
दहावी परीक्षेला बसलेल्या 16 लाखांवर विद्यार्थ्यांपैकी 94 हजार 544 विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले. मराठी राज्याची राजभाषा तर देशाची अभिजात भाषा असताना हा निकाल लागला. याउलट गुजराती भाषेचा निकाल मात्र 100 टक्के लागला.
संस्कृत भाषेचा निकाल 99.21 टक्के, अरेबिक भाषेचा निकाल 99.59 टक्के लागला असताना मराठी भाषेचा निकाल मात्र 92.57 टक्के लागला आहे. राज्यात सर्व शाळांना मराठी विषय अनिवार्य करणारी सुधारणा कायद्यात झाली. बारावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य झाला. मात्र शालेय शिक्षणात भाषेची पिछेहाट कायम आहे.
या परीक्षेत एकूण 35 विषयांपैकी 12 विषयांचा निकाल 100 टक्के लागला. मात्र प्रथम भाषा म्हणून मराठी विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या राज्यातील सुमारे 10 लाख 87 हजार 699 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 80 हजार 803 विद्यार्थी नापास झाले.
म्हणजेच जवळपास 8 टक्के विद्यार्थी नापास झाले; तर द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठी विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या एकूण 4 लाख 13 हजार 917 विद्यार्थ्यांपैकी 13 हजार 741 विद्यार्थी नापास झाले. प्रथम मराठी आणि द्वितीय मराठी अशी निवड केलेले एकूण 94 हजार 544 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
मागील वर्षीही दहावीच्या परीक्षेत मराठीत तब्ब्ल 9 हजार 486 विद्यार्थी मायबोली मराठी विषयात नापास झाले होते. मराठी हीच मातृभाषा असलेले विद्यार्थी मराठी विषयातच नापास होत आहेत, याचा अर्थ या विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य अवगत नसल्याचेच स्पष्ट होत असून मराठी विषयाच्या अध्यापन प्रक्रियेच्या पुनर्विचाराची गरज या निकालाने अधोरेखित केली आहे.