

कसारा: नाशिक-मुंबई मार्गावरील नवीन कसारा घाटात सोमवारी रात्री कंटेनर पलटी झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. ही घटना सोमवारी रात्री बारा वाजून दहा मिनिटाच्या सुमारास घडली. हा कंटेनर पलटी होऊन तो पूर्णपणे रस्त्यावर आडवा झाल्याने मुंबई कडे जाणारी वाहतूक ३ तास ठप्प झाली होती.
नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला एक महाकाय कंटेनर हा भरधाव वेगात कसारा घाट उतरत असताना घाटात ब्रेक फेल झाल्याने पॉइंटच्या पुढील वळणावर कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कंटेनर जागीच पलटी होऊन महामार्गांवर आडवा झाला.
सुदैवाने चालकाने उडी मारल्याने तो बचावला असून तो अद्याप फरार आहे. या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य, बाळू मांगे, जसविंदर सिंग, देवा वाघ यांच्यासह कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार झोंबाड, पोलीस हवालदार खादे व महामार्ग पोलीस घोटी केंद्राचे कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू केले.
तब्बल तीन तासांच्याअथक प्रयत्नानंतर महाकाय क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला करण्यात आल्यानंतर पहाटे ३ वाजेच्या सुमारास मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात आली.