

मुरबाड : एकीचे बळ मिळेल, येईल कामाला, धनदांडग्यांचा एकमेव हेतू पैसा कमावणे हाच असतो, गोरगरीब पिडीताला पुढे करून संघर्षामध्ये उतरवायचे आणि ठेकेदार, प्रशासनासोबत परस्पर वाटाघाटी करुन आपली झोळी भरुन घ्यायची हा कोयना धरण, बारवी धरण, चोंढे धरणातील अनुभव पाहता आपली फसगत होऊ द्यायची नाही. असा निर्धार करीत प्रस्तावीत काळु धरणातील बाधीत होत असलेल्या शेतकऱ्यांनी हा लढा स्वतःच्या हातात घेऊन लढण्याचा निर्धार केला असल्याचे या लढ्याचे नेतृत्व करीत असलेले ग्रामपंचायत सदस्य भरत राऊत, जयवंत थोरात, शकील शेख, अरुण राऊत, श्याम राऊत यांनी सांगीतले.
नुकतेच जिल्हाचे जिल्हाधिकारी यांनी मुरबाड तालुक्यातील प्रस्तावीत काळु धरण परिसराला भेट दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काळु धरण होणार असल्याची चर्चा सुरू होताच बाधीत होणारे शेतकरी धरण नको या भूमिकेवर ठाम असून धरण बांधून आम्ही मरण ओढून घेणार नाहीत. काहीही झाल तरी आमचा काळु धरणात तीव्र विरोध राहणार आहे. त्यातच बाधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या ग्रामसभात धरण विरोधात ठराव पारित करण्याचा निर्णय सर्वमुखी घेतला आहे.
परंतु काळु धरण व्हावे म्हणून काही धनदांडगे टपले असून, बाधीत गावातील सर्वसामान्याला पुढे करून आंदोलन करायचे आणि सरकार व ठेकेदारासोबत तडजोड करून आपले स्वहित साधायचे असा त्यांचा मनसुबा आहे. जे बारवी, चोंढे, तानसा, वैतरणा धरणात झाले होते तेच येथे होणार अशी पक्की भावना येथील ग्रामस्थांची झालेली आहे. त्यामुळे चासोळे ग्रामपंचायतीचे सदस्य भरत राऊत, जयवंत थोरात, शकील शेख, अरुण राऊत, श्याम राऊत, कैलास निमसे, नंदकुमार राऊत, अनिल आलम, प्रवीण देशमुख, महेश हरिभाऊ राऊत व इतर पिडीत होणारे शेतकरी यांना सोबत घेऊन धरण विरोधातील लढा तीव्र करण्याचा पवित्रा घेतलेला आहे.
गरज पडल्यास इंदवीताई तुळपुले साठे, मेधाताई पाटकर या नेहमीच काळु धरणग्रस्तांच्या सोबत राहिलेल्या आहेत. त्यांचीही मदत या लढ्यात घेतली जाणार आहे. हे धरण पेसा विभागात येत असल्याने येथील ग्रामपंचायतींची भुमिका निर्णायक राहणार आहे. परंतू बहुतांश सरपंच हे भाजपाशी सबंधित असल्याने त्यांनी ठरावाला मंजूरी दिली तर ग्रामस्थ आणि सरपंच यांच्यात तिर्थ संघर्ष वाढणार आहे.