डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा कचराकुंड्यामुक्त कल्याण डोंबिवलीसाठी खटाटोप करणार्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने ओला-सुका कचर्याचे वर्गीकरण करून हा कचरा घंटागाडीतच टाकावा, असा नियम आहे. केडीएमसीने कोरोना काळात याची अंमलबजावणी करून ओला-सुका कचरा वेगळा घेण्यास सुरुवात केली.
कल्याण डोंबिवलीकरांकडून प्रतिसाद मिळत असल्याने शहरातील अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या हटविण्यात आल्या. आता पालिकेने कचराकुंड्यांच्या जागेवर रोपांच्या कुंड्या ठेवल्या असून त्यातून प्रशासनाने पर्यावरणाचा संदेश दिला आहे.महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे व्यवस्थापक अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, वसंत डेगलुकर आणि त्यांच्या सहकार्यांनी यासाठी अथक मेहनत घेतली आहे. ठिकठिकाणी कचराकुंड्या असल्याने या कुंड्यांच्या सभोवताली घाणीचे साम्राज्य पसरले होते.
यावर तोडगा काढत घनकचरा व्यवस्थापन विभागाने रस्त्यावर कचरा टाकणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. ओला-सुका कचरा वर्गीकरण करणे बंधनकारक केल्याने जवळपास 60 टक्के नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला. ओला कचर्याचे खत तयार करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आला आहे. तर सुका कचर्यातील प्लास्टिक रिसायकलिंग प्रकल्प सुरू करण्यात आले.
काही ठिकाणी नागरिक रस्त्याच्याकडे ज्या ठिकाणी कचराकुंड्या होत्या त्या ठिकाणी कचरा टाकत होते. यावर अंकुश आणण्यासाठी केडीएमसीने त्या ठिकाणी रोपांच्या कुंड्या लावल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचा वाडा येथे अशा प्रकारे रोपांच्या कुंड्या लावल्याने सदर परिसर स्वच्छ व सुंदर दिसत आहे. यातून केडीएमसीने झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश दिला आहे.
हेही वाचा