

भाईंदर : राजू काळे
दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा गेल्या फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू करण्याचा मुहूर्त लांबणीवर पडल्यानंतर हा टप्पा केव्हा सुरू होणार, त्याची प्रतीक्षा शहरातील प्रवाशांना लागून राहिली आहे.
नेहमी तारीख पे तारीख मिळत असल्याने त्यात शहरातील प्रवाशांचा अपेक्षाभंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दहिसर ते भाईंदर दरम्यानची मेट्रो रेल्वे दोन टप्प्यात सुरु करण्याचा निर्णय एमएमआरडीएने गतवर्षी घेतला होता. त्यातील दहिसर ते काशिगाव दरम्यानचा पहिला टप्पा गेल्या डिसेंबर 2025 मध्ये तर काशिगाव ते भाईंदर दरम्यानचा दुसरा टप्पा डिसेंबर 2026 मध्ये सुरु करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र पहिला टप्पा डिसेंबर 2025 नंतर फेब्रुवारी 2026 मध्ये सुरु करण्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील मेट्रोची ट्रायल रन 14 मे 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घेण्यात आली. 28 जानेवारी 2026 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने सर्व शासकीय कामांचे सोहळे रद्द करण्यात आले. त्याचा फटका दहिसर ते भाईंदर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला देखील बसला. यामुळे फेब्रुवारी मध्ये सुरु होणाऱ्या पहिल्या
टप्प्यातील मेट्रो सुरु होण्याचा मुहूर्त लांबणीवर पडला. परिणामी शहरातील प्रवाशांची प्रतिक्षा केवळ प्रतिक्षाच ठरल्याचे स्पष्ट झाले असतानाच पहिल्या टप्प्यातील काही अत्यावश्यक कामे प्रलंबित असल्याचे बोलले गेले. मात्र हा पहिला टप्पा सुरु होण्यासाठी अत्यावश्यक ठरलेले मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने मेट्रोचा पहिला टप्पा फेब्रुवारीच्या मध्यान्हात सुरु होणे अपेक्षित होते. मात्र त्याला तांत्रिक अडचणीमुळे हेतुपुरस्सर विलंब केला जात असल्याने त्यावर संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे शहरातील प्रवाशांचा मेट्रो प्रवास केव्हा सुरु होणार, त्यांचा प्रवास सुसह्य केव्हा होणार, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वास्तविक पहिल्या टप्प्यातील पश्चिम महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलाला जोडून मेट्रो मार्गाखालील उड्डाणपूलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मेट्रो सुरु झाल्यास त्या पुलाच्या बांधकामात तसेच मेट्रो मार्गात तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच पहिल्या टप्प्यातील मेट्रो सुरु होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आयोजित महिलांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याने त्याच दिवशी त्यांच्या हस्ते मेट्रोचा पहिला टप्पा सुरु होण्याची अटकळ अनेकांकडून करण्यात आली होती. मात्र ती सुद्धा पोकळ ठरल्याने पहिल्या टप्प्यातील मेट्रो सुरु होण्याचा मुहूर्त अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे तूर्तास स्पष्ट झाले आहे. यामुळेशहरातील प्रवाशांचे वेळेत मेट्रो सुरु होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार कि काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
दहिसर ते भाईंदर दरम्यानचा मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाल्यास महामार्गावरील तसेच मीरारोड मधील प्रवाशांना प्रवासाचा पर्याय उपलब्ध होऊन त्यांना विनाअडथळा थेट गुंदवली तेथून अंधेरी मार्गे घाटकोपर व वर्सोवा येथे पोहोचता येणार आहे. याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट स्थानक 3 द्वारे थेट कुलाबापर्यंत प्रवास करता येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस व दक्षिण मुंबईतील मंत्रालय, विधान भवन येथे देखील प्रवाशांना सुलभपणे ये-जा करता येणार आहे.
अंधेरी, घाटकोपर दरम्यानच्या साकीनाका, पाईपलाईन, मरोळ, सफेद पूल आदी परिसरात मोठ्याप्रमाणात औधोगिक वसाहत असल्याने या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा मोठा आहे. त्यात मिरा-भाईंदरमधील प्रवाशांचा देखील समावेश असल्याने त्यांना परिवहन बस, खासगी वाहने व रेल्वे लोकलद्वारे प्रवास करण्यास मेट्रोचा पर्याय उपलब्ध होऊन त्यांचा प्रवास जलद व सुसह्य होऊ शकणार आहे. त्यामुळे मेट्रोचा पहिला टप्पा लवकर सुरू करून शहरातील प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.