

अंबरनाथ: तळ गाठलेले येथील चिखलोली धरण अवघ्या सात दिवसात ओव्होर फ्लो झाल्याने अंबरनाथकरांनी समाधान व्यक्त केले आहे. चिखलोली धरण ओव्होर फ्लो झाल्याने लागू करण्यात आलेली पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.
अंबरनाथच्या चिखलोली धरणातून दररोज सहा एमएलडी इतके पाणी वितरित केले जाते. हे पाणी शहराच्या पूर्व भागातील जागृती गल्ली, वडवली, मोरीवली पाडा, ग्रीन सिटी, मंगलमूर्ती सोसायटी, बी-कॅबिन रोड, एमआयडीसी परिसर, नवरे नगरचा काही भाग, महालक्ष्मी नगर आणि आंबेडकर नगर अश्या साधारण ५० हजार पेक्ष्या जास्त लोकवस्ती ला वितरित केले जाते.
उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे चिखलोली धरणातील पाणीसाठा घटला होता. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुरुवातीला २९ मे पासून दर शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर १५ जूनपासून आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात लागू केली होती. मात्र आता अवघ्या सात दिवसात चिखलोली धरण ओव्होर फ्लो झाल्याने ही पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.
सहा एमएलडी पाणी उपलब्ध होणार
चिखलोली धरणाची उंची अडीच मीटरने वाढवण्याचा प्रस्ताव मागील २०१३ साला पासून प्रलंबित आहे. मात्र आता या धरणाच्या उंची वाढवण्याच्या प्रक्रियेला मूर्त स्वरूप आल्याने व त्यासाठी ५१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देखील मिळाल्याने डिसेंबर २०२६ पर्यंत हे धरण रिते करून उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात करण्यात येऊन हे काम डिसेंबर २०२७ पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा मजीप्रा ने व्यक्त केली आहे. त्यामुळे अंबरनाथकरांना सहा एमएलडी पाणी उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.