भिवंडी : शहरात हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने नऊ वर्षाच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली. त्यानंतर तो फरार होता. भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला शुक्रवारी (दि.५) रात्री उशिरा ताब्यात घेतले. अभय यादव असे या नराधमाचे नाव आहे.
शहरातील शांतीनगर परिसरातील एका तीन मजली इमारतीत आपल्या कुटुंबाबरोबर ही बालिका राहत होती. या बालिकेचे वडील यंत्रमाग कारखान्यात तर आई गोदामात कामाला जात होती. आपल्या दोन्ही मोठ्या मुलींना सुध्दा आपल्या सोबत आई कामाला घेऊन जात होती. तर भाऊ शाळेत जात होता. गुरुवारी सुद्धा हे कुटुंब नेहमीप्रमाणे कामाला गेले तर मुलगा दुपारी शाळेत गेला होता. बालिका आपल्या घराला कुलूप लावून खेळण्यासाठी बाहेर थांबली होती. या दरम्यान इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एकटाच राहणाऱ्या नराधमाने बालिकेला खाऊचे आमिष दाखवून आपल्या घरात बोलावले. त्यानंतर त्या नराधमाने तिच्यावर अत्याचार करून तिची गळा आवळून हत्या केली.
भाऊ शाळेतून सायंकाळी घरी आल्यानंतर त्याला घराला कुलूप दिसले. त्यानंतर त्याने आपल्या लहान बहिणीचा आसपास शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. त्यानंतर कामावरून घरी परतलेल्या आई व मोठ्या बहिणींनीही बालिका परिसरात शोध घेतला. दरम्यान परिसरातील एका छोट्या मुलाने बालिकेला वरच्या मजल्यावरील खोलीत जाताना बघितले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी तिसऱ्या मजल्यावर जाऊन शोध घेतला असता एका बाहेरून कडी लावलेल्या खोलीत बालिकेचा मृतदेह आढळून आला.
बालिकेचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी एकच टाहो फोडला. या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड पोलिस फौजफाटा घेऊन परिसरात दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन आयजीएम रुग्णालयात रवाना केला. दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री उशिरा शहरातून पळून जाण्याच्या तयारीत त्याला ताब्यात घेतले.