

नेवाळी: देशभरात यंदाच्या संभाव्य एल-निनोच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून पाणी बचत आणि जलसंधारणा बाबत जनजागृती केली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील नदीपात्रांमधील सिमेंट बंधाऱ्यांच्या दुरुस्तीकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही अनेक बंधाऱ्यांची डागडुजी व मजबुतीकरणाची कामे अद्याप हाती घेण्यात आलेली नाहीत.
श्री मलंगगड परिसरासह ग्रामीण भागातील अनेक नदीपात्रांमध्ये उभारण्यात आलेले सिमेंट बंधारे सध्या जीर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी बंधाऱ्यांच्या तळभागाला भगदाडे पडली असून संरचनेची झीज स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात साठविले जाणारे पाणी बंधाऱ्याखालील फटी व भगदाडांमधून वाहून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी पाणी अडविण्याचा व भूजल पातळी वाढविण्याचा उद्देशच अपूर्ण राहण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
दरवर्षी मान्सूनपूर्व काळात नदी, नाले आणि जलसाठ्यांमधील गाळ काढणे तसेच बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची कामे संबंधित विभागांकडून केली जातात. मात्र यंदा अशा प्रकारची कोणतीही प्रभावी हालचाल दिसून येत नसल्याने प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांनी तातडीने लक्ष घालून बंधाऱ्यांची दुरुस्ती, गाळ काढणे आणि जलसंधारणाच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी वाया जाऊन आगामी उन्हाळ्यात ग्रामीण भागाला पुन्हा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.