

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सापगाव येथे कार्यरत असलेल्या अलमुरी रत्नमाला इंजिनिअरिंग कॉलेज या अभियांत्रिकी महाविद्यालयाविरोधात आलेल्या गंभीर तक्रारींची राज्य शासनाने दखल घेतली असून संस्थेच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
महाविद्यालयाच्या कार्यपद्धती संदर्भात विविध स्तरांवरून तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींमध्ये प्रशासकीय कारभार, विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्दे, शुल्क आणि अन्य शैक्षणिक बाबींवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार मनिषा कायंदे आणि महेश शिंदे यांनी हा मुद्दा विधानमंडळात उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले होते. विधानमंडळात या विषयावर चर्चा झाल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चौकशीचे संकेत दिले होते. त्यानंतर शासनाने अधिकृतपणे चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला. समिती पुढील तीन महिन्यांत शासनाला अंतिम अहवाल सादर करणार आहे.
या अहवालानंतर संस्थेविरोधातील कारभार समोर येणार आहे. समिती संस्थेविरोधातील या तक्रारींची तपासणी करणार संबंधित विभागांकडील नोंदींचा अभ्यास, शुल्क नियामक प्राधिकरणाची माहिती, तंत्रशिक्षण संचालनालयाकडील कागदपत्रे डॉ.भिरूड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी या एक सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील भिरूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उच्च शिक्षण क्षेत्रातील अनुभवी प्रशासक म्हणून त्यांची ओळख असून, चौकशी प्रक्रियेला निष्पक्षता आणि गांभीर्य प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे.
कॉलेज प्रशासनाचे ‘नो कमेंट’
पुढारीने कॉलेज प्रशासनाशी संपर्क साधला असता, वरिष्ठांकडून कॅमेऱ्यासमोर बोलण्यास मनाई असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील संशय अधिक गडद झाला आहे.या घडामोडींमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. चौकशी समितीच्या अहवालातून संस्थेच्या कारभाराबाबत नेमकी वस्तुस्थिती समोर येईल आणि आवश्यक असल्यास शासन योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.