

कल्याण: नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. बहुप्रतीक्षित ऐरोली-काटई उन्नत मार्ग प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून हे दोन्ही टप्पे जुलै महिन्यात वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे.
त्यामुळे महापे, शिळफाटा, कल्याण फाटा आणि ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
सुमारे १२.७१ किलोमीटर लांबीच्या या उन्नत मार्गामुळे ऐरोली ते डोंबिवलीदरम्यानचे अंतर जवळपास १० किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा ३० ते ४५ मिनिटांचा मौल्यवान वेळ वाचणार असून संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई ते डोंबिवली हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.
प्रकल्पातील ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग-४ या ३.४३ किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे ९२ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. तर ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड या २.५७ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.
हे दोन्ही टप्पे एकाचवेळी वाहतुकीसाठी खुले करण्याची तयारी सुरू आहे. या मार्गामुळे मुलुंड-ऐरोली पूल, ठाणे-बेलापूर मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग-४ यांच्यात अखंड संपर्क निर्माण होणार आहे.
दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा वेळ, इंधन आणि प्रवासाचा खर्च कमी होण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतुकीलाही मोठा वेग मिळणार आहे. परिणामी परिसरातील आर्थिक आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
महापे-शिळफाटा वाहतुकीला दिलासा
राष्ट्रीय महामार्ग-४ ते काटई नाका या ६.७१ किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचे कामही सुरू असून तो पुढील एक ते दीड वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण ऐरोली-काटई उन्नत मार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होईल आणि नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली व कल्याण परिसरातील वाहतुकीचे चित्रच बदलणार आहे. रोजच्या प्रवासातील वेळेची बचत, कमी होणारी वाहतूक कोंडी आणि अधिक आरामदायी प्रवासामुळे लाखो नागरिकांसाठी हा प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे.