

मुंबई: मुसळधार पावसात रेल्वे रुळात तुंबणाऱ्या पाण्याची धोकादायक पातळी ओलांडली जाणारी जवळपास ११७ ठिकाणे तपासली गेली आहेत. त्यात पूरप्रवण अशी १८ प्रमुख ठिकाणे मध्य रेल्वेकडून निश्चित करण्यात आली आहेत.
दरम्यान, त्यावर उपाय म्हणून रेल्वे मार्गातील पूरप्रवण ठिकाणे आणि घाट भागातील सुरक्षिततेसाठी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.
पावसाळ्यात रेल्वे चालवण्याचे आव्हानात्मक काम हाताळण्यासाठी पाणी साचण्यापासून बचाव, जलनिस्सारण यंत्रणेचे बळकटीकरण, संवेदनशील ठिकाणांचे संरक्षण व घाट भागातील सुरक्षा वाढवणे यावर भर देणारा सर्वसमावेशक कृती आराखडा मध्य रेल्वेने हाती घेतला आहे. यात पूरप्रवण १८ प्रमुख ठिकाणे निश्चित केली आहेत.
यापैकी, सायन-कुर्ला, चुनाभट्टी-कुर्ला, विक्रोळी-कांजुरमार्ग रोड आणि कुर्ला-टिळकनगर यांसारख्या ६ अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांवरील कामे पूर्ण झाली आहेत. पुलांची क्षमता वाढवणे, रुळांची उंची वाढवणे, मायक्रो-टनलिंग आणि जलनिस्सारण सुधारणा यांसारखी अतिरिक्त दीर्घकालीन कामे २०२८ पर्यंत टप्प्याटप्प्याने केली जात आहेत, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
या ठिकाणांची मान्सूनच्या काळात १२.५ एचपी ते १०० एचपी क्षमतेचे २१० उच्च क्षमतेचे पाण्याचा निचरा करणारे पंप तैनात केले आहेत. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा व्हावा यासाठी गटारे, मोऱ्या व पुलांखालील जलमार्गांची मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली आहे.
'कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड'च्या मदतीने व 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'च्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली येथे आधुनिक सुरक्षा उपाययोजना राबविल्या जात आहेत. दगड रोधक, जाळी बसवणे, कुंपण घालणे, बोगद्यांची प्रवेशद्वारे, गॅबियन संरचना, संरक्षक भिंतींचे बळकटीकरण आणि दगड अडवणारे खड्डे यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे