Maharashtra Politics | सुनेत्रा पवारांचे योगदान विचारता, श्रीकांत शिंदेंचे काय होते? राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल | पुढारी

Maharashtra Politics | सुनेत्रा पवारांचे योगदान विचारता, श्रीकांत शिंदेंचे काय होते? राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदार संघावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली असून त्याचे पडसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने थेट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे २०१४ मध्ये काय योगदान होते, असा प्रश्न करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान असल्याचे जाहीरपणे सांगणाऱ्या विजय शिवतारे यांच्यावर कोणती कारवाई करणार? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे. दुसरीकडे कुणी गाय मारली म्हणून वासरू मारू नये, युतीमध्ये खडा टाकण्याचे काम करू नये, असे प्रतिउत्तर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी परांजपे यांना दिले आहे. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार- विजय शिवतारे

शिवसेनेचे विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातुन अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषदेत घेऊन पुन्हा एकदा अनेक आरोप केले. तसेच शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्यावर देखील अनेक आरोप केले. एकीकडे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी सन्मान करतो. आणि त्याही पलिकडे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी निष्ठावान आहे, असे वक्तव्य विजय शिवतारे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की, निष्ठेची व्याख्या काय ? महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगलेली आहे. पण गेले दोन दिवसापासून शिवसेनेचे विजय शिवतारे हे राष्ट्रवादी नेत्यांचा अपमान करत आहेत. राष्ट्रवादीच्या शक्तिस्थळावर आघात करीत आहेत. मुख्यमंत्री हे मुकदर्शक बनलेले आहेत. त्यांना समज देखील देण्यात आलेली आहे की नाही हेदेखील महाराष्ट्राला माहित नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगावे विजय शिवतारे यांच्याविरोधात कोणती कारवाई करणार? कारण मी मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान पण मी महायुतीतील घटक पक्षांच्या विरोधात निवडणूक लढविणार, अशाप्रकारची भूमिका असू शकत नाही. स्पष्टीकरण देण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते परांजपे यांनी म्हटले आहे.

सुनेत्रा पवार यांचे सामाजिक कार्य काय?

एकीकडे म्हणायचे पवार विरुद्ध पवार हा लढा आम्हाला मान्य नाही. एकीकडे म्हणायचे सुनेत्रा पवार यांचे सामाजिक कार्य काय आहे की त्यांना बारामतीच्या लोकांनी मतदान केले पाहिजे? असा देखील त्यांनी प्रश्न विचारला आहे. मग २०१४ मध्ये कल्याणच्या जनतेने असा प्रश्न विचारला पाहिजे होता का? की, डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान होते त्यांना मतदान करताना? यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाचाळवीर विजय शिवतारेंसारख्या नेत्यांवर कोणती कारवाई करणार? असा जाहीर प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

हेही वाचा

Back to top button